शाळा सुरू झाली; पण शाळेत नेमके काय शिकवायचे; याबाबत शिक्षक संभ्रमात

शाळा सुरू झाली; पण शाळेत नेमके काय शिकवायचे; याबाबत शिक्षक संभ्रमात

पुणे -  राज्यातील २९ जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा तर काही प्रमाणात सुरू झाल्या. पण शाळांमध्ये काय शिकवावे याबाबत संभ्रम असल्याचे पहायला मिळत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने झालेल्या अभ्यासाची उजळणी घ्यावी, की पुढील अभ्यासक्रम पूर्ण करावा, यात शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा पूर्णपणे बंद होत्या. मात्र ऑनलाइन आणि इंटरनेटची संपर्क यंत्रणा नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा सुरू झाल्या. मागील आठवडयातील आकडेवारीनुसार राज्यातील ११ हजार ३२२ शाळांमधील वर्ग सुरू झाले आहेत. परंतु शाळा सुरू होऊन चौदा दिवस झाले तरी अद्याप शाळेत काय शिकवावे, याबाबत शिक्षक पेचात पडले आहेत.

सध्या तरी अनेक शाळांमध्ये आतापर्यंत शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि पुढील अभ्यासक्रम शिकविलेला जात आहे. यंदा जून महिन्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले, असले तरी प्रत्यक्षात शाळा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम शिकविण्यास सुरवात करायची, याबाबत कोणतेही निश्चित धोरण सरकारने जाहीर केलेले नाही.

दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या म्हणजे नेहमीच्या पद्धतीने प्रथम सत्र संपले आणि दुसरे सत्र सुरू झाले, असे म्हणून सध्या शाळा सुरू असून त्याप्रमाणे शिकविले जात आहे. पण पहिल्या सत्राच्या समाप्तीबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. या सत्राच्या मूल्यमापनावर विद्यार्थ्याचे पास- नापास अवलंबून आहे; म्हणूनच नेमका कोणता अभ्यासक्रम शिकवणे अपेक्षित आहे. त्याच्याशी निगडित परीक्षेचे कामकाज काय अपेक्षित आहे, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात आहेत. याबाबत लवकरात लवकर शासन आदेश अपेक्षित आहे. इयत्ता दहावी आणि बारावी यांची परीक्षा संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमावर असते. त्यामुळे त्याची अडचण नाही. अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यासही अवधी आहे. त्यामुळे सरकारने प्रत्यक्ष सुरू झालेल्या वर्गात काय शिकवावे, याचे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता व माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com