Loksabha 2019 : पुण्यात गोंधळामुळे वाढल्या तक्रारी

Loksabha 2019 : पुण्यात गोंधळामुळे वाढल्या तक्रारी

पुणे -  मतदानाचा टक्का वाढून त्याचा उच्चांक होईल, अशा थाटात घोषणा करीत निवडणूक आयोगाने मतदानाचे नियोजन केले; पण, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदान यंत्राऐवजी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच ‘बोट’ ठेवण्याची वेळ मतदारांवर ओढविली. मतदार यादीत नावे नाहीत, नावातच बदल झाला, मतदान आणि केंद्र सापडत नसल्याने मंगळवारी मतदानाने नव्हे, तर तक्रारींनीच उच्चांक गाठल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळाले. 

दुसरीकडे, एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याने विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. नाव आणि केंद्र शोधण्यासाठी ऐनवेळी तीही भरउन्हात धावपळ करावी लागल्याने ज्येष्ठ नागरिक प्रंचड हैराण झाले. मुळात, हा गोंधळ मतदार याद्यांचा असल्याचे सांगत, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखविल्याने मतदारांना हेलपाटे मारावे लागल्याचे चित्र काही भागांत होते. 

अंतिम मतदार यादी जाहीर होण्याआधी मतदारांच्या हरकती- सूचनांनुसार बदल केल्याचे सांगण्यात आले होते, त्यामुळे मतदार याद्या अचूक असतील या आशेने केंद्रात आलेल्या मतदारांची घोर निराशा झाली. मतदार यादीतील नावांसह केंद्र क्रमांक न मिळाल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले, त्यामुळे नागरिक आणि निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांत वादाच्या घटना घडल्या. चौकाचौकांत राजकीय पक्षांचे बूथ होते, तरी यादीत मतदारांचे नावच नसल्याने कार्यकर्त्यांपुढेही मर्यादा होत्या. 

एरंडवणे येथील कलमाडी शाळेत आलेले ब्याऐंशी वर्षीय विनायक सरनाईक म्हणाले, ‘‘माझ्या मुलाने मतदान केले; पण दीड तासापासून माझे नाव कुठे आहे, हे कोणीच सांगितले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी घरी निघालो.’’

सिंहगड रस्त्यावरून कोथरूडमध्ये मतदानासाठी आलेल्या शशिकला पवार म्हणाल्या, ‘‘येथील शाळेत माझे मतदान असल्याचे सांगिल्याने आले. परंतु, या केंद्रात नाव नसल्याने मी दीड तास बसून आहे. मला मतदान करता आले नाही.’’

‘‘महापालिकेच्या निवडणुकीला मतदान केले; मात्र आता माझे नाव सापडले नाही. माझ्या पत्नीचे नाव होते; परंतु माझे नसल्याने मी मतदान करू शकलो नाही,’’ अशी तक्रार शास्त्रीनगरमधील गणेश पवार यांनी केली.  

ज्येष्ठांची गैरसोय
एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांत आल्यानेही नागरिकांची गैरसोय झाली. तसेच, मतदार यातील क्रमांकही चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. सिंहगड रस्त्यावरील वृद्धा संयोगिता सुर्वे आणि त्यांच्या पतीचे नाव दोन वेगळ्या केंद्रांत होते, त्यामुळे या दोघांना भरउन्हात फिरावे लागले. तर, धायरीतील सुनील धुमाळ हे मतदान केंद्रात पोचण्याआधीच त्यांचे मतदान झाल्याचे उघड झाले. मतदान केले नसल्याची तक्रार धुमाळ यांनी अधिकाऱ्यांकडे केली; मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com