भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली.
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ३० वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागणार आहे.
दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जातील, त्यांनी निवडणुकीत किती पैसा वाटला किती काही केल तरी हा क्षणिक आनंद आहे. त्यांची सत्ता गेल्यावर लोक नमस्कार देखील घालणार नाही.
विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करायचं हाच अजेंडा घेऊन फडणवीस काम करतात. लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. हेमंत रासने यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पाडलं .
असं रविद्र धंगेकर म्हणाले होते. त्यांवर भाजपचे नेते आणि पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ट्विट करत धंगेकरांना खोचक सल्ला दिला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आपण मा.देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले.
आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व मा.देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. मा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत.
कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत. असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता पासून धंगेकर आणि रासने संघर्ष कसबा आणि महाराष्ट्राला पाहिला मिळण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.