पुणे - 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. कॉंग्रेस आणि मनसेच्या विचारधारेत खूप अंतर आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये आम्ही मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. हवे तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करावा, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मांडले. भाजपने आमदार राम कदम यांचा राजीनामा घेऊन हिंमत असेल, तर तेथे निवडणूक घ्यावी, ''असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती चांगली आहे, पण त्यांना नेटाने कारभार करता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचे यशापयश चव्हाण यांनी "सकाळ' माध्यम समूहाच्या "सरकारनामा' फेसबुक लाईव्हमध्ये मांडले. पश्चिम महाराष्ट्रात यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. कदम यांचे वक्तव्य, त्यावरील भाजपची भूमिका आणि आगामी निवडणुकीतील संभाव्य राजकीय गणिते यावरही चव्हाणांनी मोकळेपणाने चर्चा केली.
चव्हाण म्हणाले, 'जनसंघर्ष यात्रेला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आहे. हा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील जनता या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्याने त्यांना काय फायदा झाला, हे मला माहीत नाही. पण, मुख्यमंत्री फडणवीस हे हुशार असल्याने कोणाला काय द्यायचे ते त्यांना कळते.''
|