महाराजांच्या घोषणेच्या वादातून कॉंग्रेसमध्येही पडली ठिणगी; खर्गे यांना हटविण्याची कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मागणी 

mik.jpg
mik.jpg

पुणे ः श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची घोषणा दिल्याबद्दलच्या वादात आता कॉंग्रेसमध्येही ठिणगी पडली आहे. महाराजांच्या घोषणेला आक्षेप घेणारे कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून प्रभारीपदाची जबाबदारी काढून घ्या, अशी मागणी पुणे शहरातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एका पत्राद्वारे पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे गुरुवारी केली. 

 राज्यसभेत बुधवारी नवनियुक्त सदस्यांना उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी खासदारपदाची शपथ दिली. भाजपकडून महाराष्ट्रातून निवडले गेलेले उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय शिवाजी, जय भवानी अशी घोषणा दिली होती. त्यावेळी खर्गे यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे नायडू यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेली घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. या बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक विभागाने नायडू यांना 20 लाख पत्र पाठवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अवमान झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच कॉंग्रेसचे खासदार आक्षेप का घेत आहेत, हे त्यांनाच विचारा, असे त्यांनी म्हटले आहे. 

या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पत्र पाठवून महाराजांच्या नावाला आक्षेप घेणारे खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी कसे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राज्याच्या प्रभारीपदावरून तातडीने त्यांना काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेची अस्मिता आहे. महाराजांना महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात मानले जाते. त्यांच्या नावावर कॉंग्रेसचे नेते आक्षेप कसा घेऊ शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कॉंग्रेसचे शहर चिटणीस विनय ढेरे, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, हडपसरचे ब्लॉक उपाध्यक्ष देविदास लोणकर, पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉकचे उपाध्यक्ष राकेश भिलारे, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय शिंदे आदींनी हे पत्र पाठविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना माननारा मोठा वर्ग कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, आजी-माजी खासदार, आमदार आहेत. त्यांनाही खर्गे यांचे हा आक्षेप रूचलेला नाही. परंतु, दबावापोटी ते उघड बोलण्यास कचरत आहेत, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

खर्गे हे गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांनीही बुधवारी राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली आहे

(Edited by : sagar diliprao shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com