पुणे - प्रभात रस्त्यावरील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आणि दुसरीकडे कात्रज, धनकवडी, बालाजीनगरमधील पाणीपुरवठा सलग दोन दिवस विस्कळित झाला.
या भागांत रविवारी (ता. २९) दुपारऐवजी रात्री उशिराने पाणी सोडले, तर आज सकाळी काही ठिकाणी पाणी आलेच नाही. कात्रजमधील महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य नसल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद असतो.
काही भागांत ठरवून कमी-अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून, वेळापत्रकाप्रमाणे ते दिले जात नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार लोकप्रतिनिधींची आहे. देखभालीसाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद आणि त्या दरम्यान विद्युतविषयक कामे सुरू असल्याने या भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, तो पूर्ववत केला आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.
पोलिस वसाहतीतील समस्या तशीच
शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना गेल्या सहा-आठ महिन्यांपासून भेडसावणारी पाण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही. येथील लोकांना काही दिवस टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. परंतु, पावसाळा सुरू झाल्याचे सांगत तेही बंद केल्याने ‘ना नळाला पाणी; ना टॅंकरचे पाणी’ अशी अवस्था या वसाहतीतील लोकांची आहे. या परिसरात दिवसाआड पाणी सोडले जात असल्याची तक्रार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.