पाण्याअभावी दौंड तालुक्यामधील पिके चालली जळून 

पाण्याअभावी दौंड तालुक्यामधील पिके चालली जळून 

कुरकुंभ : यंदा धरणांमध्ये मुबलक पाणी असताना कालवा सल्लागार समिती व पाटबंधारे विभागाच्या पाणी सोडण्याच्या नियोजनाअभावी दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील खडकवासला कालव्याच्या वितरिका 32 व 35 च्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना 70 ते 75 दिवसांनी पाण्याचे आवर्तन मिळत असल्याने पिके जळून खाक झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून 400 ते 450 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर 2020 मध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती. त्यामुळे यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ कालवा सल्लागार समिती व पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी कालव्याला वेळीवर पाण्याचे आवर्तन सोडण्यात अडचणीत येत आहेत. याचा फटका कालवा व वितरिकेंच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला बसत आहे.

खडकवासला कालव्याला मागील पाण्याचे आवर्तन 1 जानेवारी 2021 ला सोडण्यात आले होते. मात्र पाऊस मुबलक झाल्याने या आवर्तनातून शेतकऱ्यांनी पाणी न घेतल्याने पाटबंधारे विभागाने आवर्तन उरकते घेतल्याने यातील पाणी शिल्लक राहिले. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दौंड तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या वितरिका  35 ला 10 ते 12 दिवस पाण्याचे आवर्तन चालते मात्र मागील वेळी पाण्याची गरज नसल्याने 3 ते 6 जानेवारी असे तीन दिवस पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात उन्हाळी आवर्तन सुटेल असे वाटले होते. प्रत्यक्षात हे आवर्तन दोन महिन्यानंतर सोडण्यात आल्याने वितरिका 32 व 35 वितरिकेवरील पिके जळून खाक झाली आहेत. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कांदा, मका, ऊस, भुईमूग, हरभरा इत्यादी पिकांना समावेश आहे. केवळ पाणी सोडण्याच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार खडकी ग्रामपंचायत सदस्य रघुनंदन काळे व संजय काळे, गोरख कामठे, रघुनाथ पवार या शेतकऱ्यांनी केली.

कालव्याला 30 दिवसांनी पाण्याचे आवर्तन सुटने अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र 60 दिवसांनी सुटत आहे. त्यामुळे वितरिका 32, 35  च्या पाण्यावर अवलंबून पिकांना 70 ते 75 दिवसांनी पाणी मिळणार असेल तर पिके जाणार आहे. त्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आवश्यक असल्याचे मत पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता रवींद्र जाधव यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार हे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com