'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत

rte.jpg
rte.jpg

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने 31 ऑगस्ट ही मुदत निश्चित‌ केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना या तारखेपर्यंत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी यासंबंधी म्हटले आहे, की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत 17 मार्च‌ रोजी काढण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 

"प्रवेशासाठी निश्चित‌ केलेल्या मुदतीनंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 31 ऑगस्टनंतर वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे, त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत 31 ऑगस्टपूर्वी जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा," असे जगताप म्हणाले.

पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्यातील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com