नारायणगाव : कोरोनाचे उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

नारायणगाव : कोरोनाचे उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

नारायणगाव : कोरोनामूळे अत्यवस्थ झालेल्या आर्वी (ता. जुन्नर) येथील ज्येष्ठ नागरिकाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने  मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक व जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केला आहे. दरम्यान, नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युक्त बेड शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णाला दाखल करून घेण्यात आले नाही, अशी माहिती नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आगाम यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशी आर्वी येथील ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता. ते होम क्वारंनटाईन होते. अत्यवस्थ झाल्याने नातेवाईकांनी त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णाची स्थिती पाहून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. त्या मुळे त्यांना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र रुग्णालयात ऑक्सिजन युक्त बेड नसल्याचे कारण सांगून येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्या नंतर नातेवाईक रुग्ण घेऊन पुन्हा घरी गेले. दरम्यान या बाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्या बुचके यांना मिळाली. त्यांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकारी यांची कानउघडणी केली. या बाबत त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना माहिती दिली. त्या नंतर बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी  तयार झाले. त्या नंतर सहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईक रुग्णाला घेऊन ग्रामीण रुग्णालयात आले. तपासणी केली असता रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले.

या घटनेमुळे नातेवाईक व जिल्हा परिषद सदस्या बुचके या संतप्त झाल्या. या घटनेमुळे  बुचके या भावूक होऊन रुग्णालयाच्या आवारातच त्यांना रडू कोसळले. या घटनेची चौकशी झाल्या शिवाय मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका बुचके यांनी घेतली. या मुळे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

येथील रुग्णालयाची २४ ऑक्सिजन युक्त बेड आहेत. चोवीस अत्यवस्थ रुग्ण दाखल असल्याने बेड शिल्लक नसल्याने रुग्णाला दाखल करता आले नाही.सध्या रुग्ण संख्या वाढल्याने येथे आलेले अत्यवस्थ रुग्ण मंचर अथवा पुणे येथील रुग्णालयात पाठवण्यात येत आहेत.हीच परिस्थिती इतर रुग्णालयात आहे.-डॉ. योगेश आगाम( वैद्यकीय अधीक्षक,  ग्रामीण रुग्णालय नारायणगाव) 

नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेऊन उपचार करणे आवश्यक होते. वेळेत उपचार न मिळाल्याने शेतकरी कुटुंबातील जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.-आशा बुचके (जिल्हा परिषद सदस्या)

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com