Pune News : हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखड्याला जिल्हा समितीची मंजुरी

पुढील मंजुरीसाठी हा आराखडा राज्य सरकारकडे पाठविणार
chandrakant patil
chandrakant patilsakal

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने सोमवारी (ता.३१) मंजुरी दिली. हा आराखडा आता पुढील मंजुरीसाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी या आराखड्याला मंजुरी दिली. या बैठकीला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर,

खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे आदी उपस्थित होते.राजगुरुनगर हे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ आहे. त्यांच्या या जन्मस्थळाच्या ठिकाणाचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार राज्याच्या

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १४ मार्च २०२३ रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखडा समिती स्थापन केली होती.

या समितीने स्थळ पाहणी करून हा विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यात राजगुरू यांचे जन्मस्थान असलेली खोली आणि सध्या अस्तित्वात असलेल्या हुतात्मा राजगुरू स्मारकाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या बाबींचा समावेश आहे.

राज्याच्या पुरातत्त्व विभागामार्फत मुख्य स्मारक विकास आराखडा तर, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी आवश्‍यक संकल्पनांवर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती.

यावेळी स्मारकाच्या अनुषंगाने तयार केलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या स्मारकाच्या आराखड्याचे टप्पे करून प्राधान्याने मुख्य भागाच्या विकासावर भर देण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली.

आराखड्याची तीन टप्प्यात अंमलबजावणी

या विकास आराखड्याची चार टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील विकासकामे ही पुरातत्त्व विभागामार्फत केली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात बांधकामविषयक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे.

विकास कामांसाठी २५४ कोटींचा निधी

या विकास आराखड्यातील कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी २५४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील विकासकामांसाठी ९४ कोटी ९९ लाख रुपये तर,

दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी १५९ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण निधीपैकी ७७ कोटी ८२ लाख रुपये ही स्मारकाच्या परिसरातील विविध कामांसाठी, ५८ कोटी ६२ लाख रुपये हे बाग, नदी घाट विकास, संरक्षण भिंत बांधणे आदी कामांसाठी तर, उर्वरित २२ कोटी ६८ लाख रुपये हे स्मारक विकासाशी, भूमी संपादनासाठी खर्च केले जाणार आहेत.

आराखड्यातील प्रमुख विकासकामे

- जन्मखोली, थोरला वाडा, मुख्य दरवाजा व स्मारकाचा जीर्णोद्धार

- स्मारकातील वाचनालय, कॅफेटेरिया (उपाहारगृह) उभारणी

- रामघाट, चांदोली घाट आणि त्याकडे जाणारा दरवाजा व पायऱ्या

- संरक्षित भिंत, वाहनतळ, पदपथ, अंतर्गत रस्ते

- जमीन सौंदर्यीकरण (लॅंडस्केप),

- खुले सभागृह, पुतळे, शिल्पे उभारणी

- संपूर्ण स्मारकाचे विद्युतीकरण

- प्रकाश व ध्वनी सादरीकरण (लाइट ॲण्ड साउंड शो)

- संग्रहालय, तालीम, देशभक्त निवास

- वाहनतळ विकास, अस्तित्वातील रस्त्यांचा विकास

- फर्निचर, विद्युतीकरण, परिसर विकास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com