दिग्गजांना संमेलनाध्यक्षपद नाही हा करंटेपणाच : डॉ. अरुणा ढेरे 

दिग्गजांना संमेलनाध्यक्षपद नाही हा करंटेपणाच : डॉ. अरुणा ढेरे 

पुणे : अनेक दिग्गज साहित्यिकांनी कर्तव्यनिष्ठेने कार्य केले, पण त्यांना सन्मानाने अध्यक्षपदी बसविले नाही. हा आपला करंटेपणा आहे. त्यांच्या ऋणातच आपण आहोत. म्हणूनच यवतमाळचे साहित्य संमेलन साधेपणाने व्हावे. मात्र खऱ्या साहित्यप्रेंमींच्या उपस्थितीत श्रीमंत व्हावे, अशी अपेक्षा यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. 
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. रांगोळ्या काढून, पणत्या उजळवून चौघड्याच्या सुरावटीत डॉ. ढेरे यांना औक्षण करण्यात आले. त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, डॉ. नीलिमा गुंडी, उल्हास पवार उपस्थित होते. साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांतर्फेही डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. ढेरे यांचे सभागृहात आगमन होताच उपस्थित श्रोतृवर्गाने त्यांना उभे राहून मानवंदना दिली आणि निवडणुकीपेक्षाही डॉ. ढेरे यांची अध्यक्षपदी थेट नियुक्ती झाल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, "महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल ही राज्ये प्रबोधनपर्वात आघाडीवर राहिली. पुरोगामी व परिवर्तनशील महाराष्ट्रात साहित्य संस्कृतीचे अंतरंग ओळखणाऱ्या रसिक वाचकांच्या उपस्थितीत संमेलन व्हावे. कारण अनेक साहित्यिकांनी सृजनशील लेखनातून साहित्य घडविले. त्यांचे ऋण आपण फेडूया.'' डॉ. गुंडी म्हणाल्या, ""डॉ. ढेरे यांनी ललित, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर संशोधनपर लेखन केले. मात्र त्यांच्या लेखनावर काव्यात्मक वृत्तीचा ठसा आहे. कारण त्या कवयित्री आहेत. वाचन संस्कृतीच्या त्या उपासक आहेत. त्यांच्या निवडीने मराठी विश्‍व अक्षरशः आनंदून गेले आहे.'' 

प्रा. जोशी म्हणाले, "संमेलनाध्यक्षाचे पद आतापर्यंत सन्मानाने दिले जात नव्हते. मतांसाठी साहित्यिकांना याचना करावी लागत होती. सरस्वतीच्या उपासकांना पालखीत बसवून आणण्याची पद्धत असायला पाहिजे. परंतु डॉ. रा. चिं. ढेरे, शिवाजी सावंत, विंदा करंदीकर हे या सन्मानापासून दूर राहिले. अरुणाताईंची निवड झाल्यामुळे सारस्वतांनी आजच दिवाळी साजरी केली. त्या अभिनव वाग्विलासिनी आहेत. प्रज्ञा व प्रतिभेचा संगम त्यांच्यामध्ये दिसतो.'' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com