प्रस्तावांवर ४८ तासांमध्ये निर्णय घ्यावा - देवेंद्र फडणवीस

Drought
Drought

पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८ तासांत निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी ‘ऑडिओ ब्रीज सिस्टिम’द्वारे पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील सरपंचांशी सोमवारी मोबाईलवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला हे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सरपंच आणि अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली व गावागावांतील पाणीटंचाईची परिस्थिती समजून घेतली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्‍यांमधील ३० सरपंचांशी त्यांनी संवाद साधला.

प्रशासन आणि लोकसहभागातून दुष्काळावर निश्‍चित मात केली जाईल. तहसीलदारांनी गावातील २०१८ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल, प्रधान सचिव भूषण गगराणी, अनुप कुमार, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ६६ कोटी वितरित 
जिल्ह्यात दुष्काळ घोषित केलेल्या सात तालुक्‍यांतील ८३७ गावांमधील सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ६६ कोटी ४३ लाख रुपये वितरित करण्यात आले; तसेच पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईपोटी आठ हजार ४१५ शेतकऱ्यांना सहा कोटी ४४ लाख रुपये अदा केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती आणि शिरूर या सात तालुक्‍यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्‍यांपैकी १२ तालुक्‍यांमधील ११६ गावे आणि ९८८ वाड्या-वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत १९६ टॅंकर सुरू आहेत. त्यात बारामती ३७, पुरंदर २६, आंबेगाव २५, दौंड २२, जुन्नर १९, शिरूर १९, इंदापूर १४, हवेली १०, खेड आणि मुळशी तालुक्‍यात प्रत्येकी आठ; तसेच भोर आणि वेल्हे तालुक्‍यात प्रत्येकी चार टॅंकरचा समावेश आहे. 

पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात ५१२ विंधन विहिरीद्वारे, ५२ नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून, १० तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून आणि ५७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे.  जिल्ह्यात तीन सरकारी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत; परंतु सेवाभावी संस्थांच्या दोन छावण्या सुरू असून, त्यामध्ये १३५ जनावरे दाखल आहेत.

अडीच लाख शेतकऱ्यांची नोंदणी 
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३८ हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी साडेसात कोटी रुपये दिले आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७२८ कामे सुरू आहेत. त्यावर दोन हजार ६३७ मजूर उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com