व्यापाराच्या विकेंद्रीकरणामुळे दलालांवर "संकट' 

व्यापाराच्या विकेंद्रीकरणामुळे दलालांवर "संकट' 

पुणे - मार्केट यार्डातील घाऊक किराणा भुसार मालाच्या व्यापाराचे विकेंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे ग्राहक थेट कंपन्यांकडून माल खरेदी करीत आहेत. तसेच ग्राहकांसमोर ऑनलाइनचा पर्यायदेखील आला आहे. परिणामी दलालीचा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजाराची माहिती ठेवणे, ग्राहकाला चांगली सेवा देणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, या गोष्टी "अपडेट' कराव्या लागत असल्याचे मत दलाल व्यक्त करीत आहेत. 

उत्पादक, वितरक ते विक्रेता यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे दलाल होय. दलाली व्यवसायातील पूर्वीची स्थिती आणि पुढील काळातील परिस्थितीविषयी बंकटशेठ रुणवाल आणि आशिष नहार यांनी "सकाळ'शी दलाली व्यवसायाविषयी संवाद साधला. 1961पासून दलाली व्यवसाय करणारे रुणवाल हे भवानी पेठ, नाना पेठ, गणेश पेठ येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात दलाली करीत होते. त्या वेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दलाल होते. पुणे ही मोठी बाजारपेठ असल्याने येथून राज्याच्या बहुतेक भागांत माल जात होता. ""त्या काळात रेल्वेने माल पुण्यात येऊन तो पुढे पाठविला जात असे. खरेदीदार मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करीत असत. आज ही स्थिती राहिली नाही. सर्वच ठिकाणी वाहतुकीची साधने उपलब्ध झाली आहेत. दुकानांची संख्या वाढली आहे, त्यामुळे पुण्यातून माल विकत घेण्यापेक्षा थेट माल मागविणे, हे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत आहे. दहा-पंधरा गोणीदेखील थेट विक्रेत्याकडे उत्पादक पाठवीत आहेत.'' 

मार्केट यार्ड येथे किराणा भुसार मालाचा बाजार स्थलांतरित झाल्यानंतर दलालीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. या व्यवसायात नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नहार म्हणाले, ""बाजारपेठ खुली झाली आहे, त्यामुळे दलाली व्यवसाय करणाऱ्यांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. पूर्वी तेजी-मंदी जास्त नव्हती. आता तेजी मंदी सातत्याने निर्माण होते. पुण्याच्या बाजारपेठेतील ग्राहक थेट खरेदी करीत आहेत. इंटरनेट, मोबाईल यांसारख्या सुविधांमुळे कोणत्याही बाजारपेठेतील भाव सहज कळू शकतात. अशा परिस्थितीत व्यवसाय टिकविण्यासाठी प्रत्येक पिकाचे उत्पादन किती, प्रत्येक बाजारपेठेची माहिती, कोणत्या ग्राहकाला कोणता माल हवा असतो, अशी सर्व प्रकारची माहिती असणे गरजेचे झाले आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com