पुणे : प्रवाशांची संख्या सातत्याने घटत असलेल्या 'पीएमपी'ला वातानुकूलित ई-बसच्या रूपाने आशेचा नवा किरण प्राप्त झाला आहे. साध्या बसच्या तुलनेत ई-बसचे प्रवासी 23 टक्क्यांनी जास्त आहेत. एका अर्थाने या बस जणू लक्ष्मीच्या पावलांनीच पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) संस्थेच्या 'अर्बन मोबिलिटी ट्रान्स्फॉर्मेशन सर्व्हिसेस' या उपक्रमांतर्गत पीएमपीमधील पारंपरिक बस आणि नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित ई-बसच्या कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. त्यातून ही बाब समोर आली आहे. 'आयटीडीपी'च्या श्रेया गडेपल्ली आणि अनुज ढोले यांनी हा अभ्यास केला आहे.
खर्चात 60 टक्क्यांनी घट
ई-बसमुळे इंधनाचा खर्च 60 टक्क्यांनी घटला आहे. ई-बसच्या सरासरी 98 टक्के बस दररोज धावत असतात. त्या तुलनेत दैनंदिन कार्यान्वित असणाऱ्या साध्या बसची संख्या सरासरी 75 टक्के असून, त्यातील 15 टक्के फेऱ्या विविध कारणांमुळे रद्द होतात. अचानक गाड्या बंद पडल्याने खर्च वाढत असून, पीएमपी तोट्यात जात आहे.
लवकरच वाढणार चार्चिंग स्टेशन
'सीएनजी'वर चालणाऱ्या बसपेक्षा ई-बसला प्रतिकिलोमीटर 25 टक्के अधिक उत्पन्न मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या पीएमपीचे भेकराईनगर आणि निगडी डेपो येथे चार्जिंग स्टेशन आहे. त्या ठिकाणी अनुक्रमे 52 आणि 30 चार्जिंग पॉइंट्स आहेत. लवकरच सात नवीन चार्जिंग स्टेशन प्रस्तावित असून, त्या ठिकाणी 345 चार्जिंग पॉइंट्स असणार आहेत.
ई-बसचे आर्थिक गणित
-प्रति किलोमीटर विजेवर खर्च 8 रुपये
-प्रति किलोमीटर होणारा खर्च 71 रुपये
साध्या बसचे आर्थिक गणित
-प्रति किलोमीटर "सीएनजी'वर खर्च 20 रुपये
-प्रति किलोमीटर होणारा खर्च 90 रुपये
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.