मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रखडले

Education
Education

पुणे - 'घरच्या घरी नियमितपणे अभ्यास करता यावा, म्हणून आमच्या १३ वर्षाच्या मुलाची नाव आम्ही महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात नोंदविले. यावर्षी मार्चमध्ये मंडळामार्फत मूल्यमापन होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे मूल्यमापन झाले नाही. अद्याप मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार की नाही हे जाहीर न केल्याने गोंधळ उडत आहे,' अशा शब्दांत मुक्तपणे अभ्यास करण्याऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचे पालक कळवळून सांगत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिव्यांग, विशेष प्राविण्य असणाऱ्या किंवा अन्य विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही शालेय परीक्षा देता यावी यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ दीड-दोन वर्षापूर्वी सुरू झाले. या मंडळाअंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतात. चौदा वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येते. मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. त्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांशी समकक्ष असणार आहेत.

राज्य मुक्त विद्यालय मंडळाअंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीतील ४५ आणि आठवीतील १३९ विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परीक्षा होणार होती. परंतु दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हे मूल्यमापन रद्द करण्यात आले. त्यानंतर मंडळाने या मूल्यमापन परीक्षेबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरू झाले आहे. मात्र मुक्त विद्यालयात यंदाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी देखील अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शाळेत न जाताही शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमात आहेत.

मुक्त विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन लवकरच
'राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२० मधील दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुक्त विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे (मूल्यमापन) नियोजन होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ शकले नाही. परंतु परिस्थिती पाहुन लवकरच निर्णय घेऊन वेळापत्रक जाहीर केले जाईल."
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com