पुणे : "सोशल मीडियामुळे क्रांती झाली आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. याच माध्यमातून फेक न्यूजचा प्रसार करून समाजात अशांतता निर्माण केली जात आहे. याचा अनेकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. या फेक बातम्या पसरविण्याचे काम सुशिक्षित लोकही करत आहेत. हे समाजासाठी अधिक हानिकारक आहे,'' असे प्रतिपादन जम्मू कश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष हाजी अनायत अली यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित भारतीय छात्र संसदेत "फेक न्यूज आणि सोशल मीडिया' या विषयावर अली बोलत होते. या वेळी एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. धारूरकर, नवज्योत कौर, शैलेश कुमार पांडे, इमाद हुसैन, ज्येष्ठ पत्रकार अमिताभ सिन्हा उपस्थित होते.
"युवकांनी समाजमाध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. समाजाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी या माध्यमाच्या सकारात्मक वापरावर त्यांनी भर द्यावा. फेक न्यूजपासून सजग राहत समाज माध्यमांतील आपल्या हक्कांना समाजाच्या हितासाठी वापरले पाहिजे,'' असे आवाहन अली यांनी केले.
पांडे म्हणाले, ""आपल्या भावनांचा समाज माध्यमावर व्यापार झाला आहे, ते चुकीच्या बातम्यांचे व्यासपीठ झाले आहे. संचाराच्या माध्यमाचे हे वरदान अभिशापामध्ये बदलले आहे. त्यामुळे या माध्यमाला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.''
"सोशल मीडिया हा आपले विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. यातून तरुणांना शक्ती मिळाली आहे. मात्र त्याचा जबाबदारीने, सारासार बुद्धीने विचार करत वापर करायला हवा,'' असे मत नवज्योत कौर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट आणि नलिनी शर्मा यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.