पुणे - कौटुंबिक वादातून गेल्या वाच वर्षांपासून एकमेकांची बोलणे थांबविलेले, तसेच स्वतंत्रपणे स्वयंपाक करून गुजराण करणाऱ्या जोडप्यातील वाद शनिवारी झालेल्या लोकअदालतीत अखेरचे मिटले. उतार वयात दोघांना एकमेकांची गरज असल्याचे समुपदेशामध्ये समजावून सांगण्यात आले. त्यामुळे दोघेही वाद विसरून पुन्हा एकत्र आले.
दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने पत्नीने न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पतीविरूध कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा देखील दाखल केला. हा दावा निकाली काढण्यासाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला होता. अशोक आणि लक्ष्मी (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव. अशोक हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तर लक्ष्मी या गृहिणी आहेत.
अशोक यांच्यावतीने अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी तर लक्ष्मी यांच्यावतीने अॅड. अनिलकुमार जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली. पती व्यवस्थित पालनपोषण करीत नाही, असा पत्नीचा आरोप होता. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून दोघांत वाद होता. यामुळे दोघे एकमेकांना बोलत नव्हते. अगदी स्वयंपाकही एकाच घरात वेगवेगळा करत. दोघांतील वाद विकोपाला गेल्यामुळे लक्ष्मी यांना फेब्रुवारीमध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला.
पतीने दरमहा पोटगी द्यावी, अशी मागणी पत्नीने केलेल्या दाव्यात करण्यात आली होती. दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला. दोघांत यशस्वी समुपदेशन झाले. पतीने दरमहा पत्नीला आठ हजार रुपये द्यायचे. तसेच पत्नीच्या इतर आवश्यक बाबींसाठी लागतील तसे पैसे पतीने द्यायचे आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करायचा, या अटींवर हे प्रकरण निकाली निघाले.
उतार वयात दोघांना एकमेकांची गरज आहे. राहिलेले आयुष्य एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने राहण्याचे दोघांना समुपदेशनात सांगण्यात आले. दोघे एकमेकातील वाद विसरले. नव्याने जगण्यास सुरुवात केली.
- ॲड. सचिनकुमार गेलडा आणि अॅड. अनिलकुमार जाधव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.