शेतकरी आहेत; देशद्रोही नाहीत!

Agitation
Agitation

पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी, आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी अत्याचार केला जात असल्याने महाराष्ट्रातील विचारवंत, लेखक उद्विग्न झाले आहेत. ते शेतकरी आहेत, देशद्रोही नाहीत, त्यांच्याशी सन्मानाने बोला, असे त्यांचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेखक राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, जयंत पवार, कृष्णात खोरे, सुरेखा दळवी, अरुणा सबाने यांनी निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र सरकार आणि स्थानिक पोलिसांकडून सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्‍याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीहल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता केंद्र सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे, असे मत लेखकांनी मांडले आहे.

सरकारच्या भूमिकेवर टीका
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्वसुद्धा हे सरकार पार पाडत नाही, हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे या निवेदनात म्हटले आहे.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, तर दुसरीकडे नवा कायद्यात काय आहे, याची चिंता त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने संवाद साधला पाहिजे. केंद्र सरकार ते करीत नाहीत. आंदोलन करणारे हे शेतकरी आहे, देशद्रोही नाहीत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
- अतुल देऊळगावकर, लेखक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com