हिंजवडी : रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतकरी हवालदिल

माण ग्रामस्थांची व्यथा; बोअरवेल्स, विहिरीमधील पाणी सुद्धा दूषित
Hinjewadi
Hinjewadisakal

हिंजवडी : येथील आयटीपार्कमधील काही कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे माण (maan) ग्रामस्थांना शेतीसह आरोग्याची समस्या भेडसावत आहे. कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या या रसायनमिश्रित पाण्यामुळे (chemical water) शेतीचे नुकसान होत आहे. बोडकेवाडीसह आजूबाजूच्या भागात पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल्स व विहिरींमधील पाणी सुद्धा दूषित होत आहेत. (Farmers worried due to chemical water Hinjewadi)

ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपन्यांना अनेकदा पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिलेली असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. नियमबाह्य पद्धतीने व इतरांना धोका निर्माण होईल, अशा प्रकारे रसायनमिश्रित पाणी बाहेर सोडणाऱ्या या बेजबाबदार कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फेज दोन हद्दीतील काही कंपन्यांकडून रसायनमिश्रित पाणी कसलीही प्रक्रिया न करता, बोडकेवाडी परिसरातील नाल्यात सोडण्यात येते. ते पाणी नाल्यावाटे जवळ असलेल्या दगडी खाणीत जाऊन साचते. साठलेले पाणी जमिनीत मुरते, तसेच परिसरातील शेतात मिसळते. काही दूषित पाणी जवळील नैसर्गिक ओढ्याने फेज दोन येथून परदेशी वस्ती, मुलाणी वस्ती, राक्षे वस्ती मार्गे नदीला जाऊन मिळते.

"रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतीचे नुकसान होऊन बोअरवेल्स आणि विहिरींचे पाणी दूषित होणे अतिशय गंभीर बाब आहे. याबाबतीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी बोलून, सर्व तपशील घेऊन व खात्री करून यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल," अशी माहिती मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.

"अनेक वर्षांपासून आम्हाला शेती करताना, या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मळमळ होणे, अंगाला खाज सुटणे, अशा त्वचा विकारामुळे शेती करणे अवघड झाले आहे," अशी व्यथा आयटीनगरी माण येथील शेतकरी गणेश परदेशी यांनी मांडली.

आंदोलनाच्या पवित्र्यात

आयटीपार्क हद्दीतून येणारे दूषित रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरत असल्याने बोडकेवाडीसह मुलाणी वस्ती, राक्षे वस्ती याठिकाणी असलेल्या बोअरवेल्स आणि विहिरींचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे याबाबतची तक्रार केली आहे. ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांनाही या कंपन्या दाद देत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी रोष वाढत आहे. रसायनमिश्रित पाणी सोडण्याचे रोखले गेले नाही, तर बेजबाबदार कंपन्यांसमोर त्रस्त ग्रामस्थ धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com