अकरावी प्रवेशाच्या पहिला दिवशी पावणे चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Online-Admission
Online-Admission

पुणे - अकरावी प्रवेशाची पहिल्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या सुमारे तीन हजार ९४० विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. तर जवळपास १३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया (प्रोसिजर फॉर एडमिशन) सुरू केली असल्याची माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा लागली होती. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित गुणवत्ता यादी रविवारी जाहीर झाली. त्यात यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी या शाखेतील अभ्यासक्रमासाठी ४० हजार १३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेश देण्यात आला आहे. तर सुमारे १९ हजार ५७५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (ता.31) सकाळी दहा वाजल्यापासून गुरूवारी (ता.3) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली आहे. प्रवेश यादीत नाव आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली, तर काही विद्यार्थ्यांची प्रक्रिया सुरू आहे. 

अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) जवळपास पावणे दोनशे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी सांगितले. ते म्हणाले,"विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयात एक अर्ज भरून घेण्यात येत आहे. तसेच ऑनलाइन शुल्क भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन चलन भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यासाठी पाच-सहा वर्ग खुले केले असून संगणक कक्ष देखील सुरू ठेवला आहे. त्याशिवाय पहिल्या गुणवत्ता यादीत बीएमसीसीत प्रवेशासाठी नाव लागलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रवेशाकरिता संदेश देखील पाठविण्यात येत आहे."

नूतन मराठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (मुलींचे) विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी एकूण  जवळपास २००हुन अधिक जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थिंनींपैकी १५ टक्के विद्यार्थिंनींनी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेतला, असे मुख्याध्यापिका नेहा पेंढारकर यांनी सांगितले. 

तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा मिळून एकूण पंधराशेहुन अधिक जागा आहेत. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी सकाळपासून फोन येत होते. जवळपास पाचशे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पहिल्याच दिवशी सुरू झाली आहे, अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com