आळंदी : ''घाण पाणी असले म्हणून काय झाले साहेब! मासे तर पाण्यातच मिळणार, धंदापाणी काय नाय आणि इथं भांडवल लागत नाही. पाण्यात उतरायचं आणि रोज वीस पंचविस किलो मासे घेवून जायचे. विकून आलेल्या पैशात घर चालवायचं. दिवसभर पाण्यात उभं राहायला वंगाळ वाटतं, पण पोट आहे आणि पैसेही चांगले मिळतात'' अशी आळंदीत इंद्रायणीत मासेमारी करणाऱ्या बबन केवळ, संजय वाबळे, आणि त्यांच्यासारख्या अन्य मासेमारी करणारे किमान शंभर ते दिडशे लोकांची दिवसभरची दिनचर्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार बंद पडला, पण मासेमारीने अनेकांना हात दिला. पोटासाठी काही तरी करायला पाहिजे. ठाकर समाज तर आळंदीतील इंद्रायणी नदीत नित्याने मासेमारी गेली कित्येक वर्षे करत आहे. आळंदीतीलच नाही तर कडाची वाडी, खेडच्या अन्य भागातील ठाकरही अधूनमधून मासेमारीसाठी आळंदीत येतात. त्यात भर पडली ती परप्रांतियांची. विशेष म्हणजे येरवडा, विश्रांतवाडी, चिखली, वाघोली आणि मरकळ औद्योगिक भागात राहणारे भैय्येही आळंदीत ते तुळापूर अशाच पद्धतीने इंद्रायणीत मासेमारी करत आहेत. दिवसभरात काहींना दहा वीस किलो तर काहींना पंचवीस तीस किलो मासे आरामात मिळतात. काही जण तर दोनवेळच्या जेवणापुरते मिळाले बस असा विचार करून मासेमारीसाठी इंद्रायणीवर येतात.
आळंदी, चाऱ्होळी, धानोरी, मरकळ, तुळापूर, गोलेगाव भागात ठिकठिकाणी इंद्रायणीच्या प्रदुषित पाण्यात उतरून मासेमारी सध्या जोरात सुरू आहे. चिलापी, राहू, पोपट, वाम अशा प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणी गळ लावते. कुणी जाळे लावून मासेमारी करतात. जाळे लावून दिवसभर पाण्यात उभे राहावे लागते. वास्तविक गटाराचे पाणी वाहते. त्यामध्ये बेसुमार वाढलेली जलपर्णी आणि त्यात माशांबरोबरच साप, विरूळे आढळतात. जलपर्णीवर प्लॅस्टिकचा कचरा आणि वेळप्रसंगी त्यातच उभे राहून मासेमारी करावी लागते. मासेमारीसाठी प्रदुषित पाणी असले तरी मासे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने तेवढे कष्ट यांच्याकडून घेतले जात आहे.
- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी
याबाबत संजय वाबळे म्हणाले,''आम्ही अनेक वर्षे मासेमारी करतो.घरच्यासाठी आणि विकण्यासाठी मासेमारी दोन तिन तास करतो.वाघोलीहून मासेमारीसाठी मरकळ येथील बंधा-यावर आलेला परप्रांतिय देवाशिष यांनी सांगितले की,लॉकडाऊन काळात रोजगार बंद झाला.घर चालवायचे कसे? मग मासेमारी करून पोटापुरते मिळते. पाणी घाण आहे, पण पोटासाठी बिगर भांडवली व्यवसाय आहे.''
वास्तविक पिंपरी औद्योगिक भागातून प्रदुषित सांडपाणी सुरूवातीच्या लॉकडाऊनमध्ये बंद झाल्याने नदीपात्र निवळले होते. त्यामुळे माशांची पैदास चांगली होत होती. परिणामी मासेमारीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली. आता उद्योगधंदे सुरू झाले आणि चिखली कुदळवाडीतील प्रदुषित सांडपाणी पुन्हा नदीत सोडण्याचे प्रमाण सुरू. परिणामी पाणी प्रदुषित झाले, जलपर्णी वाढली. औद्योगिक भागातील लोक पोटासाठी विविध छोटोमोठे कुटिरोदयोग करत आहे, मात्र सांडपाणी सोडण्याची चांगली यंत्रणा नसल्याने थेट इंद्रायणीत सोडले जाते. जलपर्णीमुळे मासे मरतात, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. इंद्रायणी याच पाण्यावर चिलापी माशांची पैदास जादा होत असल्याने मासेमारी करणारांना चिंता नाही. फक्त जाळे लावून दिवसभर पाण्यात उभे राहयचे एवढेच कष्ट.
कोरोनानंतर मुलांमधील "पिम्स' आजारासंबंधी डॉक्टरांचा सल्ला, वाचा सविस्तर
''इंद्रायणी प्रदुषण रोखणे आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. दोन वेळा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यतेखाली पुण्यात बैठकाही झाल्या, मात्र कोरोनामुळे त्यात खंड पडला. आता पुन्हा यावर राज्य सरकार काय करणार किंवा पिंपरी महापालिका आणि अन्य नगरपालिकामधून होणारे प्रदुषण थांबवणार कधी'' असा सवाल आळंदीकर आणि वारकरी विचारत आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पालिकेने इंद्रायणीतील जलपर्णी हटविण्याची नौटंकी केली. पुराच्या पाण्यात काही प्रमाणात जलपर्णी ढकलली आणि अर्धवट केलेल्या कामाचे बिल मात्र लावले, मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठून आहे. त्यावर साचलेल्या कुजक्या वस्तूंमुळे वास येतो. मच्छर वाढतात पण पालिकेला काही देणघेणे नाही असेच चित्र आळंदीत आहे.
पुणेकरांनो, "आरटीओ'चे कामकाज आता सकाळी आठपासूनच !
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.