पूरग्रस्तांनी फोडला अधिकाऱ्यांना घाम

महापालिका भवन - पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. शंतनू गोयल यांना त्यांच्या दालनात सोमवारी घेराव घातला.
महापालिका भवन - पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. शंतनू गोयल यांना त्यांच्या दालनात सोमवारी घेराव घातला.

पुणे - घरे वाहून गेल्यानंतरही महिनाभर पुनर्वसनाच्या नियमांकडे बोट दाखविणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गाठून आंबिल ओढा परिसरातील पूरग्रस्तांनी सोमवारी पुन्हा घराची मागणी लावून धरली. आपल्या मागण्यांवर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना घाम फोडला. तर, सुरक्षाव्यवस्थेला न जुमानता एकाच वेळी अडीचशेहून अधिक पूरग्रस्त महापालिकेत आल्याने गोंधळ उडाला. घर मिळाल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका महिलांनी घेतली. तेव्हा मात्र अतिरिक्त आयुक्त डॉ. शंतनू गोयल यांनी तातडीच्या पुनर्वसनाचा शब्द दिला. त्यानंतर पूरग्रस्त शांत झाले.

शहरात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात आंबिल ओढा, राजेंद्रनगरमधील काही घरे वाहून गेली. त्यातील ३५ कुटुंबांना सव्वा महिन्यापासून शाळेत ठेवण्यात आले आहे. तर, काही जण अजूनही मोडकळीस आलेल्या झोपड्यांमध्ये राहत असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले आहे. तसेच, स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांना जेवण आणि राहण्याची सुविधाही नसल्याचे उघड झाले आहे. त्यावर या लोकांचे झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) आणि दुर्बल घटकांसाठीच्या योजनेच्या (बीएसयूपी) घरांत पुनर्वसन करण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या होत्या. मात्र, त्याबाबतची कार्यवाही होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत संतप्त पूरग्रस्तांनी नगरसेवक धीरज घाटे यांच्यासमवेत महापालिकेत डॉ. गोयल यांच्या दालनात घुसून पुनर्वसनाची मागणी केली. तेव्हा एवढ्या लोकांना दालनात जाण्यापासून रोखल्याने सुरक्षारक्षक आणि आंदोलनकर्त्यांत वाद झाला. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची भीती निर्माण झाली.

त्यानंतर डॉ. गोयल यांना घेराव घालून घरापासून अन्य सुविधांच्या मागण्यांचा भडिमार पूरग्रस्तांनी केला. त्यातही अनेक जण एकाच वेळी तक्रारी करीत राहिल्याने गोयल गोंधळून गेले.

अतिरिक्‍त आयुक्‍तांना घेराव
आंबिल ओढा भागातील काही पूरग्रस्त कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय, दुर्बल घटकांसाठीच्या (बीएसयूपी) प्रकल्पातून घरे देण्याचे नियोजन आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. शंतनू गोयल यांनी पूरग्रस्तांना सांगितले. ओढ्यातील कचरा उचलून स्वच्छता करण्याचा आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पूरस्थितीमुळे बेघर होण्यापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, अशी तक्रार पूरग्रस्तांनी करून डॉ. गोयल यांना घेराव घातला. त्यावर त्यांनी पुनर्वसनासह स्वच्छतेचीकामे हाती घेण्यात येणार आहेत, असे सांगून त्यांची समजूत काढली. डॉ. गोयल म्हणाले, ‘‘आंबिल ओढा भागातील (सर्व्हे क्र. १३३/३४) मधील ३५ कुटुंबांचे ‘एसआरए’च्या घरात पुनर्वसन केले जाणार आहे. त्याबाबतची यादी तयार करून ती ‘एसआरए’ अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यावर आता पात्र लोकांकडील कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही होईल. पुनर्वसन करताना पूरग्रस्तांच्या सर्व बाबी तपासूनच त्यांना घरे देण्यात येतील.

पंचनामे करीत असल्याचे सांगून गेले, अजूनही घराचा पत्ता नाही. आधी आम्हाला घर द्या. आम्ही पोट भरायचे की रोज यांच्याकडे चकरा मारायच्या?
- सारिका जोगदंड, पूरग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com