शिक्रापूरातील दहा घरे आणि दहा दुकाने तीन दिवसांपासून पाण्यात

शिक्रापूरातील दहा घरे आणि दहा दुकाने तीन दिवसांपासून पाण्यात

शिक्रापूर : सलग तीन दिवस झालेल्या पावसाने शिक्रापूरातील सखल भागात असलेल्या तब्बल दहा दुकाने व दहा घरांमध्ये पूर्ण पाणी साठले आहे. या गंभीर स्थितीत बाधित कुटुंबांना घरातही जाता येत नसून शेजारीच असलेल्या दोन गृहनिर्माण प्रकल्पांनी नैसर्गिक प्रवाह अडविल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप बाधित कुटुंबांनी केला आहे. दरम्यान या प्रश्नी सगळ्यांनीच वा-यावर सोडल्याने आम्ही न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती अ‍ॅड.नानासाहेब तांबे यांनी दिली तर दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास सर्वजण उपोषणास बसणार असल्याची माहिती डॉ.हेमंत दातखिळे यांनी दिली.

येथील पाबळ चौकापासून अगदी जेमतेम हाकेच्या अंतरावरील हिवरे रस्त्यावर प्रत्येक पावसात पाणी साठत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी व व्यावसायिकांची गेल्या अनेक दिवसांपासून होती. या भागातील सांडपाण्याच्या निच-यासाठी गटारलाईन काही दिवसांपूर्वी केली गेली होती, मात्र पोलिस स्टेशन शेजारील भागात दोन गृहप्रकल्प झाल्याने त्यांनी येथील नैसर्गिक प्रवाह अडविल्याने येथील पाणी पुढे जात नसल्याची तक्रार सध्या ज्यांची घरे सध्या पाण्यात आहेत त्यातील अ‍ॅड. नानासाहेब तांबे, आण्णा चव्हाण, राजेश तिवारी, रंगनाथ जाधव व सुजाता पिंगळे आदींनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अ‍ॅड. तांबे यांच्या घरातील सुमारे दहा लाखांचे फर्निचर सध्या पूर्ण पाण्यात असल्याने त्याचे पूर्ण नुकसान झाले आहे. तर तीन दिवसांपासून घरात राहणेही कठीण झाले आहे. यासिन तांबोळी, शब्बीर शहा आदींच्या घरांना कुलुप लावून या कुटुंबांना बाहेर रहावे लागत आहे. येथील एका घरात एकट्याच राहत असलेल्या शोभा शेवकरी यांना तर घरातच जाता येत नसल्याने पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबाकडे त्यांना रहावे लागत आहे. या शिवाय या भागातील सुमारे दहा दुकाने गेल्या चार दिवसांपासून पाण्यात असल्याची माहिती विश्वनाथ टाव्हरे यांनी दिली.

दरम्यान हे संपूर्ण पाणी हिवरे रोड, जातेगाव रोड व स्टेट बॅंक चौकापासून एकत्रित येवून या गटा नं.१२ च्या परिसरात येत असल्याने आणि तिथून निचराच होत नसल्याने जवळपास दहा घरे व दहा दुकानांमध्ये पाणी साठलेले असून प्रत्येक कुटुंबाचे साधारण दोन ते वीस लाखांपर्यंतचे नुकसान झाले आहे.

याबाबत गेल्या तीन दिवसांपासून शासकीय पातळीवर तक्रारी सुरू असून, कुणीच दखल घेत नाही. तर राजकीय नेत्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आम्ही सर्वांनी आता उपोषणाचा निर्णय घेत असल्याची माहिती डॉ. हेमंत दातखिळे व अ‍ॅड. नानासाहेब तांबे यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com