Harshwardhan Patil : राजकारणातील मैत्री गायब, कटुता वाढू लागली

राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. याआधी राजकारणात कधीच कोण कोणत्या पक्षाचा हे पाहिले जात नसे.
harshvardhan patil
harshvardhan patilsakal

पुणे - राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. याआधी राजकारणात कधीच कोण कोणत्या पक्षाचा हे पाहिले जात नसे. पक्षिय भिंती ओलांडून एकमेकांची मैत्री असायची. पण आता राजकारणातील मैत्री गायब होत चालली असून, पूर्वीच्या या मैत्रीची जागा कटुतेने घेतली आहे. परिणामी सध्या राजकारणात कोणाचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशी खंत राज्याचे माजी सहकारमंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.४) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. सध्या कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, हे आधी खासगीत ठरतं, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती स्व. रामभाऊ बराटे मित्र परिवाराच्या वतीने दिला जाणारा यंदाचा स्व. रामभाऊ बराटे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना तर, जीवनगौरव पुरस्कार कीर्तनकार चंद्रकांत वांजळे महाराज यांना आज हर्षवर्धन पाटील व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला रामभाऊ बराटे मित्रमंडळाचे अध्यक्ष व भाजप नेते जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन बराटे, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘सध्या राजकारणात कोण कुठे असेल, ते सांगता येत नाही. आज कोणत्या पक्षात आहे, ते पहावे लागते. उद्या कोणत्या पक्षात असतील, ते माहिती नसते. तसेच कोणाला जर शुभेच्छा दिल्या, तरी त्याला राजकारण समजले जाते. नेमके कशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत, ते समजत नाही. पण कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा असेल, तर तो आज केला जातो, असे राजकारणामागील खरे राजकारण झाले आहे.’

बराटे मित्र मंडळाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हा पुरस्कार सुरु करण्यामागची भूमिका विशद केली. पुरस्काराचे मानकरी रणजित शिवतरे, चंद्रकांत वांजळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुरली निंबाळकर यांनी आभार मानले.

आई संस्काराचे, वडील संघर्षाचे विद्यापीठ - पवार

आज काळ कमालीचा बदलला आहे. सध्याची नवीन पिढी ही चिंतन करणारी आहे. पण काळ कितीही बदलला तरी आजही आई ही संस्काराचे तर, वडील हे संघर्षाचे विद्यापीठ आहेत, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. जिल्हा परिषदेत काम करणारी मंडळी आमदार, मंत्री झालेली आहे. स्व. रामभाऊ बराटे हे यांचे राजकारणात चांगले मित्र होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com