चाकण एमआयडीसीतील या समस्येबाबत उद्योजकांकडून नाराजी

midc
midc

आंबेठाण (पुणे) : सध्या सुरू असणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात स्वच्छता आणि परिसर निर्जंतुकीकरण याला महत्त्व दिले जात आहे. परंतु, या कृतीला चाकण एमआयडीसीमध्ये मात्र छेद दिला जात आहे. एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. दिवसागणिक वाढत जात असलेल्या या कचऱ्याच्या समस्येबद्दल पर्यावरण प्रेमी आणि उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

एमआयडीसी भागातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कचरागाडी चालविली जात आहे. त्याद्वारे गावातील कचरा जमा करून तो एखाद्या ठिकाणी साचविला जात आहे. परंतु, एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला, खासगी जागेत सुरू असणारे व्यवसाय किंवा काही प्रमाणात एमआयडीसीमधील कारखानदार त्यांचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देत आहे. त्यामुळे एमआयडीसीने तयार केलेल्या प्रशस्त रस्त्यांची कचराकुंडी होत चालली आहे. 

या भागात ग्रामपंचायतीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांवर ताण येऊन कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे. कचरा जमा करण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची मोठी अडचण ग्रामपंचायतीसमोर उभी ठाकली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून सेवा मिळण्याची वाट न पाहता अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली. यात रस्त्याच्या कडेला असणारी जागा ही अनेकांना सोपी आणि सोयीची वाटू लागली. परिसरातील ग्रामपंचायतींनी याबाबत जागृत होऊन अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कडक व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे. 

अशी आहे परिस्थिती 
- कोणी पाहू नये म्हणून रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो 
- बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग 
- कचऱ्यात कोंबड्यांची पिसे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, हॉटेलमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजी बाजारामधील उरलेला 
- भाजीपाला, जुने बांधकामाचा राडारोडा, सलूनमधील केस 
- परिसरात विद्रुपीकरण होत असून अनेक ठिकाणी दुर्गंधीमुळे नाक दाबून प्रवास करण्याची वेळ 

एमआयडीसीने कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एखादा प्लांट सुरू करावा. सर्व महसुली आणि एमआयडीसीमध्ये येणाऱ्या गावांचा कचरा एकत्र गोळा करून सेंद्रिय खत किंवा कचरा प्रक्रिया करणारा प्लांट सुरू करून कचरा समस्या दूर करावी. कारण आम्हाला मिळणारा महसूल निम्मा एमआयडीसीकडे गेल्याने ग्रामपंचायतीचा महसूल कमी झाला आहे. 
- सुरेश पिंगळे-देशमुख, माजी उपसरपंच, वासुली 

एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याची समस्या वाढत असून त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच घरांसाठी दिलेले प्लॉटदेखील 33 केव्ही विद्युत लाइनच्या जवळ असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 
- सोमनाथ तरस, उद्योजक 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com