पुणे - गरिबी, भेदभाव, निरक्षरता, हिंसाचार या समस्या जगासमोर उभ्या आहेत. त्यावर मात करायची असेल, तर विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आणावे लागेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
लोणी काळभोर येथे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने उभारलेल्या जगातील सर्वांत मोठा डोम आणि संत ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी नायडू बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार विकास महात्मे, महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, संचालक डॉ. मंगेश कराड, राहुल कराड व्यासपीठावर उपस्थित होते.
जगातील तत्त्वज्ञान आणि सर्व विचारधारा या डोमने एकत्र आणल्या आहेत. विविधतेत एकता भारताचीही संस्कृती आहे. तीच संस्कृती या डोममधून प्रतीत होत आहे, असे सांगत नायडू म्हणाले, 'भारताची भूमी, पाणी, हवा आणि प्रकाश यात ज्ञानाचे तेज आहे. म्हणूनच भारतीय तरुण जगभरातील विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत. हे ज्ञानही सर्वंकष करण्याची गरज आहेत. त्यात मूल्य, शहाणपण आणि कौशल्य आणले पाहिजे.''
|