Pune News : प्रत्येक प्रश्‍नाकडे सामान्यांच्या व अर्थकारणाच्या दृष्टीकोनातुन बघण्याची गरज; गिरीश कुबेर

व्यंकटेश चपळगावर स्मृती व्याख्यानात "आजची अर्थ पत्रकारिता' विषयावर कुबेर यांनी केले मार्गदर्शन
Pune News : प्रत्येक प्रश्‍नाकडे सामान्यांच्या व अर्थकारणाच्या दृष्टीकोनातुन बघण्याची गरज; गिरीश कुबेर

पुणे : "संस्कृती मागे पडू नये असे वाटत असेल, तर आपल्याला अर्थकारणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक प्रश्नाकडे सामान्यांच्या आणि अर्थकारणाच्या नजरेने पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे माहितीचा अभाव नक्कीच नाही, मात्र त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलण्याची खरी आवश्‍यकता आहे.'' असे मत "लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्‌स ऑफ व्यंकटेश यांच्यातर्फे व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानाअंतर्गत कुबेर यांचे "आजची अर्थपत्रकारिता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर उपस्थित होते.

"अर्थ पत्रकारिते'च्या इतिहासावर प्रकाश टाकताना कुबेर म्हणाले, ""भारतामध्ये आर्थिक पत्रकारिता करायला हवी, असा विचार पुण्यातील महादेव नामजोशी यांनी 1877 मध्ये पहिल्यांदा मांडला. त्या काळात त्यांनी केवळ अर्थकारणावर आधारीत "किरण' हे वृत्तपत्र सुरू केले होते. याबरोबरच "भारतीयांच्या पारतंत्र्याची आर्थिक किंमत' या विषयावर नामदार गोखले यांनी लेख लिहिला होता. महात्मा फुले यांनी "शेतकऱ्यांचा आसूड'मधून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर भाष्य केले होते''

कुबेर म्हणाले, ""आपल्या देशात राजकारण, चित्रपट, क्रिकेट या विषयांमध्ये अनेकजण तज्ज्ञ आहेत. परंतु, अर्थकारण हेच राजकारण आहे ही खरी गोष्ट आहे. अर्थकारण मुळाशी नाही, असा एकही विषय नाही. त्यामुळे अर्थकारण न कळणे म्हणजे राष्ट्रीय पाप आहे. आर्थिक पत्रकारिता आणि आर्थिक विषयातील पदवी याचा संबंध नाही.

पत्रकारितेसाठी मूलभूत चौकस बुद्धी महत्त्वाची असते. त्याद्वारे कोणताही विचार अर्थशास्त्राच्या तत्त्वांशी जोडून घेता येतो. आर्थिक विपन्नावस्थेमुळे अस्मितावाद उफाळून येतात. सम्राट अशोकाच्या राज्याबरोबरच पाली भाषा संपुष्टात आली.

इंग्रजांचे राज्य असेपर्यंत ऑक्‍स्फर्ड इंग्रजी महत्त्वाची होती. आता अमेरिकी इंग्रजी लोकप्रिय झाली. त्यामागे अर्थकारणाची भूमिका मोलाची आहे.'' बापट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अरुण म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राची कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार सरोदे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com