Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

विद्यापीठ कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारी वेतन

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी नियुक्ती केलेल्या 224 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्‍चितीला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. हा दिलासा असला, तरी सुरवातीला केवळ 85 कर्मचाऱ्यांची वेतन निश्‍चिती होणार असून, त्यांना सरकारकडून वेतन सुरू होणार आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून वेतन दिले जात होते.

विद्यापीठाने ऑगस्ट 2014 मध्ये सरळसेवेने "क' व "ड' गटांतील 224 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यासाठी सरकारकडून पद मान्यता घेतली. मात्र, भरतीसाठी अर्हतेमध्ये बदल केला होता. ज्या पदांना सरकारने दहावी ही अर्हता निश्‍चित केली, त्या पदांसाठी बारावी ही अर्हता विद्यापीठाने निश्‍चित केली होती. या पदांची भरती झाल्यानंतर वेतन निश्‍चितीसाठी सर्व प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे गेले, त्या वेळी सरकारच्या परवानगीविना अर्हतेमध्ये बदल केल्याचे कारण देऊन वेतननिश्‍चिती रोखली होती.

दरम्यान, राज्य सरकारने 7 सप्टेंबर रोजी 85 पदांच्या वेतन निश्‍चितीस मान्यता दिली. त्यांची वेतननिश्‍चिती होणार आहे. उर्वरित 139 कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे त्या श्रेणीचे वेतन दिले जात आहे. विद्यापीठातील पदनाम बदल गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या पदांची वेतन निश्‍चिती करू नये, असा आदेश सरकारने दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्‍चितीबाबत निर्णय होणार आहे, असे विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या 85 कर्मचाऱ्यांचे वेतन निश्‍चितीचे प्रस्ताव सोमवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केले आहेत.

विद्यापीठाला खर्च मिळणार का?
विद्यापीठाने भरती केल्यानंतर वेतन निश्‍चिती होऊन दोन महिन्यांत वेतन सुरू होणार होते. परंतु वेतन निश्‍चिती रखडल्याने पाच वर्षांपासून विद्यापीठ फंडातून पगार केले जात होते. त्यासाठी 30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्ची पडली आहे. वेतन निश्‍चितीस मान्यता मिळाल्याने विद्यापीठाने खर्च केलेली रक्कम परत मिळणार का?, हा प्रश्‍न आहे. याबाबत सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, 'कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती दिनांकापासून वेतन निश्‍चिती होईल अन थकबाकीही मिळेल. ही रक्कम विद्यापीठाला मिळणार असल्याने त्यांनी खर्च केलेली रक्कम त्यांना मिळेल.''

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वेतननिश्‍चितीला परवानगी मिळावी, असा प्रयत्न होता. परवानगी मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, विद्यापीठ फंडावरील भारही कमी होईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com