अकरावी प्रवेशासाठी 'कट-ऑफ'ची स्थिती काय राहणार, वाचा ही बातमी

अकरावी प्रवेशासाठी 'कट-ऑफ'ची स्थिती काय राहणार, वाचा ही बातमी

पुणे : राज्य मंडळ असो किंवा सीबीएसई, आयसीएसई असो. दहावीच्या निकालात एकुणच वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाचा टक्का आणि 'कट-ऑफ' देखील लक्षणीयरित्या वाढण्याची शक्‍यता आहे. यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ तब्बल तीन ते पाच टक्‍क्‍यांनी वाढेल, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, आता विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या गेल्या वर्षीच्या कट-ऑफची यादी अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे नुकतीच जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावा, यासाठी ही यादी काही दिवस आधीच जाहीर करण्यात आली आहे. "यंदाच्या निकालाची एकूणच टक्केवारी पाहता कट-ऑफ देखील वाढण्याची शक्‍यता आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मते कट ऑफ तीन ते पाच किंवा पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढेल. मात्र, अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ सरासरी पाच टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे, असे शिवाजीनगर मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी सांगितले. 

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, "राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे यंदा कट ऑफ तीन ते पाच टक्‍क्‍यांनी वाढणार आहे.'' तर नूतन मराठी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यावेक्षक डॉ. माधुरी भामरे म्हणाल्या, "यंदा राज्यातील दहावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांहून अधिक वाढला आहे. तर पुणे विभागाचा निकाल 15 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा कट ऑफ चार ते पाच टक्‍क्‍यांनी नक्कीच वाढणार आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'कट-ऑफ' वाढण्याची कारणे 

  • राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी
  • 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
  • 80 ते 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या

वाढलेल्या निकालामुळे प्रवेशात होणार वाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनेने जास्त आहे. यंदा या मंडळांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे निदर्शनास येते. सीबीएसई दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.36 टक्‍क्‍यांनी, तर राज्य मंडळाचा (एसएससी) निकाल मार्च 2019 च्या तुलनेत तब्बल 18.20 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुण्याकडे ओढा कायम राहणार

दहावीनंतर अकरावी आणि उच्च शिक्षणासाठी गावाहून आणि परराज्यातून शिक्षणासाठी विद्येच्या माहेरघरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. जवळपास हजारो विद्यार्थी अकरावीपासूनच पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा पुण्याकडे येण्याचा कल कायम राहणार, की त्यात बदल होणार याची उत्सुकता सध्या दिसत आहे. मात्र, असे असले तरीही पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बाहेरगावाहून प्रवेशासाठी विचारपूस होत आहे. डॉ. शेठ म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग वाढत असला, तरीही अकरावी प्रवेशावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. अकरावी प्रवेश प्रक्रियेनंतर कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले तरीही, वर्ग हे निदान नोव्हेंबरपर्यंत तरीही ऑनलाईनच भरतील. त्यामुळे बाहेरगावहुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर फारसा परिणाम होणार नाही,''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com