आयटीयन्सची दमछाक

Road-Issue
Road-Issue

पिंपरी - हिंजवडी आयटी सिटीला जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याव्यतिरिक्‍त अन्य रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या रस्त्याचा वापर करणाऱ्या आयटीयन्सची दमछाक होत आहे. घोटावड्याकडून येणारा रस्ता थेट आयटी पार्कच्या तिसऱ्या फेजमध्ये येतो. पाषाणवरून चांदे नांदे माणमार्गे येणारा रस्ता आयटी पार्कला जोडला गेला आहे. शिवाजी चौकाच्या तुलनेत या रस्त्यावर वाहतूक कमी असते. त्यामुळे अनेक जण याचा नियमितपणे वापर करीत असतात. पावसाळ्यात दोन्ही रस्ते उखडले आहेत. मात्र, आजतागायत त्यात सुधारणा झाली नसल्याने आयटीयन्स हैराण झाले आहेत. 

रस्त्यांची सद्यःस्थिती काय? 
आयटी सिटीमध्ये येण्यासाठी शिवाजी चौकातील मुख्य रस्त्याखेरीज घोटावडे आणि चांदे-नांदे भागातून रस्ता उपलब्ध आहे. या दोन्ही रस्त्यांची अवस्था खराब असली तरी वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण या रस्त्यांचा वापर करीत आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांत सातत्याने वाढ होत आहे. दोन्ही रस्ते पूर्णपणे उखडले असून, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी पडल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार या रस्त्यावर होत असतात. दोन्ही रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जून महिन्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयटी पार्कला जोडणारे रस्ते दुरुस्त करण्यात येतील, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप या कामाला मुहूर्त न लागल्याने आयटीयन्सना त्रास सहन करावा लागत आहे. 

मेट्रोच्या कामानंतर वाहतूक कोंडीत भर
पीएमआरडीएने शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो सुरू करण्याचे ठरवले आहे. आगामी दोन महिन्यात हिंजवडी परिसरात मेट्रोच्या कामाला सुरवात होईल. त्यानंतर फेज तीनमधून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे. 

मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी आयटी पार्कला जोडणाऱ्या अन्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवाजी चौकातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. आयटी पार्क परिसरात अन्य नवे रस्ते प्रस्तावित आहेत, त्यांनादेखील गती मिळण्याची आवश्‍यकता आहे. 
- कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त), चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, 
हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशन 

आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी शिवाजी चौकातील रस्त्याखेरीज अन्य दोन रस्ते आहेत. अनेक दिवसांपासून ते खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. एमआयडीसीने हा रस्ता रुंद करून त्याचे काँक्रिटीकरण केले तर या भागातील वाहतुकीचा ताण हलका होणार आहे. प्रशासकीय यंत्रणांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 
- मंगेश पारखी, आयटी अभियंता, हिंजवडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com