
Pune Massacre : राज्यात अमानुष आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारे हत्याकांड घडले आहे. भीमानदीपात्रात सात मृतदेह सापडले सापडले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे गूढ वाढत चालले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात हे मृतदेह आढळले आहेत. एकाच कुटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली. असे अनेक सामुहीक हत्याकांड यापूर्वी पुण्यात घडले आहेत. या हत्याकांडामुळे पुणे हादरले होते.
राठी हत्याकांड -
२६ ऑगस्ट १९९४ साली पुण्यातील पौड फाट्याजवळील शीलविहार कॉलनीत अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. राठी हत्याकांडात कुंटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आला होता.
त्यांच्या दुकानातील नोकरानेच ह्या हत्या केल्या होत्या. आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. त्यानंतर पुराव्यांची जमवाजमव करुन १९ जानेवारी १९९५ रोजी याबाबतचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
हिमांशू अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राठी कुटुंबीय राहत होते. ता. २६ ऑगस्टला दुपारी अडीच वाजता केसरीमल, त्यांचा मुलगा संजय आणि जावई श्रीकांत कामानिमित्त घराबाहेर गेले. त्यानंतर हा भीषण प्रकार घडला.
या हत्याकांडाचा कट आरोपींनी घटनेच्या तीन दिवस आधी म्हणजे ता. २३ ऑगस्टला रचला होता. त्यासाठी त्यांनी दोन धारदार चाकू व मिरची पूड खरेदी केली होती. केसरीमल यांचे कोथरूडमध्ये 'सागर स्वीट्स' नावाचे दुकान होते. तेथे काम करणाऱ्या राजू राजपुरोहित व जितृ गेहलोत यांनी नारायण चौधरी या साथीदाराच्या मदतीने केसरीमल यांचे अपहरण करून पैसे लुबाडण्याचे कारस्थान रचले होते. त्यातूनच पुढे हे हत्याकांड घडले.
कल्याणी नगरमधील हत्याकांड -
१७ मे १९९७ साली कल्याणीनगर भागात एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले होते. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडलेला नाही, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. रमेश जयकुमार पाटील (वय ४५), पत्नी विजया (वय ३५), त्यांचा मुलगा (वय ८) आणि मुलगी (वय १२) हे या खुनीहल्ल्यात मृत्युमुखी पडले होते.
पाटील हे स्टेट बँक ऑफ इंडियात उपव्यवस्थापक होते व त्यांची बदली नुकतीच पुण्यात झाली होती, असे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत खातरजमा झालेली नाही. त्यांचा येथे कोणाशीही पूर्वपरिचय नव्हता. त्यांच्या कुटुंबातील सगळेच जण मारले गेले होते.
बानेर भागातील तिहेरी हत्याकांड -
२४ जुलै १९९२ मध्ये पुण्यातील बानेर भागात किलोस्कर न्यूमॅटिक्स कंपनीतील ज्येष्ठ अधिकारी मोहन श्यामराव ओहोळ यांचा पत्नी आणि मुलासह निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आले होते.
बाणेर रस्त्यावरील वर्षा पार्क सोसायटीत राहणारे श्री. ओहोळ (वय ५३), त्यांच्या पत्नी रुही (वय ४८) आणि मुलगा रोहन (वय ला २२) या तिघांचे मृतदेह त्यांच्या घरातील बाथरूममध्ये आढळून आले होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार तिघांचाही नाक-तोंड दाबल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.