# शिक्षकभरती शिक्षक भरतीशिवाय लग्न करायचं कसं? 

# शिक्षकभरती शिक्षक भरतीशिवाय लग्न करायचं कसं? 

पुणे - राज्य सरकार केवळ कागदी घोडे नाचवत, शिक्षक भरतीचे गाजर दाखवत आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार हताश झाले आहेत. परिणामी, मुलांना शिकविण्यासाठी इच्छुक असणारे हात रोजंदारी करू लागले आहेत. शिक्षक म्हणून नोकरी मिळून स्वतःच्या पायांवर उभे राहिल्याशिवाय लग्न कसे करायचे, अशा पेचात उमेदवार पडले आहेत.

राज्यातील जवळपास २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत दिरंगाई होत असल्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवार नाराजी व्यक्त करत आहेत. भरती प्रक्रियेची जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असे आश्‍वासन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहे. मात्र अद्याप जाहिरात प्रसिद्ध होण्याची अधिकृत तारीख जाहीर न केल्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे निदर्शनास येते.

आत्मविश्‍वास खालावतोय
पुण्यातील चैत्राली मुरगोड यांनी २०१३मध्ये डी.एड. पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणही घेतले. परंतु करिअर म्हणून शिक्षक होण्याचेच स्वप्न उराशी बाळगले. खरंतर विज्ञान शाखेतून अकरावी, बारावी झाल्यानंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षणाची दालने त्यांच्यासाठी खुली होती. परंतु वडिलांप्रमाणेच शिक्षक व्हायचे ठरविले होते. म्हणून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत गेल्या काही वर्षांपासून त्या आहेत. नोकरी नसल्याने आत्मविश्‍वास खालावत आहे. नोकरी नसल्यामुळे लग्न तरी कसे करायचे, अशी खंत चैत्राली यांनी बोलून दाखविली.

बोहल्यावर कसं चढणार
अमरावती जिल्ह्यातील दीपाली बोहरूपी गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘२०११मध्ये डी. एड झाले, परंतु चिकाटीने प्रयत्न करूनही गेल्या काही वर्षांत शिक्षक भरती न झाल्यामुळे हताश झाले आहे. शिक्षक पदासाठी पात्र ठरण्यासाठी असणाऱ्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले आहे. परंतु अद्याप नोकरी मिळेल, याची शाश्‍वती मिळालेली नाही. स्वतःच्या पायांवर उभे राहिल्याशिवाय लग्न तरी कसे करणार, असे मत दीपाली यांनी व्यक्त केले.

दुष्काळामुळे दुसरे कामही मिळेना!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परभणी जिल्ह्यातील माळेवाडा गावातील (ता. पात्री) नारायण चिंचाणे यांनी व्याजाने पैसे घेऊन डी.एड. पूर्ण केले. शिक्षणासाठी औरंगाबादला यावे लागले. २०११मध्ये शिक्षण पूर्ण झाले. मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने चिंचाणे हताश झाले आहेत. ‘‘दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे अन्य कोणतेही काम मिळत नाही. शेतात रोजंदारीवर कामाला जातो; परंतु तेही काम नियमित मिळत नाही. शिक्षक भरती हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्‍न झाला आहे,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com