संतविचारांपासून दूर गेल्याने वाढली दुष्ट प्रवृत्ती - पं. हृदयनाथ मंगेशकर

hridaynath mangeshkar
hridaynath mangeshkar

पुणे - ‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांच्या विचारांनी बराच काळ माणसातील पशुप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत,’’ असे मत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

आषाढी एकादशीनिमित्त ‘हेरिटेज - द आर्ट लीगसी’ आयोजित व अनाहत-पुणे निर्मित ‘घन अमृताचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचना संगीतबद्ध केल्या आहेत; त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजिला होता. यात सावनी रवींद्र यांचे सुरेल सादरीकरण झाले, तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निरूपण करीत त्या गीतांच्या निर्मिती प्रक्रियेतील आठवणी सांगितल्या. विघ्नेश जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी क्‍लबचे संचालक डॉ. योगेश चांदोरकर उपस्थित होते.

सावनी रवींद्र यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रसन्न बाम (संवादिनी), नितीन शिंदे (तबला), नागेश भोसेकर (पखवाज), प्रतीक गुजर (तालवाद्य), मिहिर भडकमकर (की-बोर्ड), प्रशांत कांबळे (साउंड), दर्शन कुलकर्णी, इंजमाम बारगीर, सुप्रया स्वामी, सुवर्ण कोळी (गायन) यांनी साथसंगत केली. मंगेशकर म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वरांच्या रचनेला चाल लावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा असतो. पण, चाल लावताना मीटरमध्ये बसविण्यासाठी काही स्वातंत्र्य घ्यावे लागते. साहित्यावर अनेक आक्रमणे झालीत. त्यामुळे मूळ शब्द कोणते आणि अपभ्रंश झालेले कोणते, हे सांगणे तसे कठीण आहे. पण, संतांचे प्रत्येक वचन गहन असते. कारण, त्यांच्यासारखे शब्दप्रभुत्व, भाषाप्रभुत्व नंतर क्वचितच कोणात आले असावे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com