आळंदीमधील कार्तिकी वारीबाबत महत्वाची बातमी

आळंदीमधील कार्तिकी वारीबाबत महत्वाची बातमी

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमी (ता. ८) पासून देऊळवाड्यासमोरील महाव्दारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरूवात होणार आहे. वारीतील मुख्य सोहळा कार्तिकी वद्य एकादशी (ता. ११) आणि माऊलींचा समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला (ता. १३) शासन निर्णयानुसार मोजक्याच्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना देवस्थानचे विश्वस्त अॅड ढगे यांनी सांगितले की, कार्तिकी वारी सोहळ्यानिमित्त मंदिरात हरिनाम सप्ताह प्रतिपदेपासून (ता. १) सुरू होईल. कार्तिकी वारीचा मुख्य सोहळा देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पुजनाने कार्तिक वद्य अष्टमीला (ता. ८) सुरू होईल.

पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते पायरीपुजन केले जाईल. त्यानंतर दुस-या दिवशी नवमी व दशमीला किर्तन जागर होईल. कार्तिकी वद्य एकादशीला (ता. ११) मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर अकरा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चाराने पहाटपूजा केली जाईल.

दुपारी एकच्या दरम्यान माऊलींची पालखी खांद्यावर घेत नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. कार्तीकी वद्य द्वादशीला(ता.१२) मध्यरात्री शासकिय पुजा  जाईल. दुपारी चारच्या दरम्यान माउलींचा चांदिचा मुखवटा रथामधे ठेवून नगरप्रदक्षिणेसाठी रथोत्सव केला जाईल. कार्तिकी वद्य त्रयोदशीला माउलींच्या संजिवन समाधी दिन असल्याने मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर पवमानपुजा केली जाईल.सकाळी दहा ते बारा संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज नामदास महाराज यांचे समाधी सोहळ्याचे किर्तन होईल. त्यानंतर पुष्पवृष्टी,घंटानाद आणि आरती झाल्यानंतर सोहळा पार पडेल. कार्तिकी वद्य चतुर्दशी(ता.१४)पालखीची छबिना मिरवणूक होईल. हे सर्व कार्यक्रम परंपरेनुसार प्रतिवर्षी केले जातात.मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारी काळात केले जाणारे परंपरागत कार्यक्रमाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडले जातील अशी माहिती श्री. ढगे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गर्दीविनाच यंदाची कार्तिकी...
दरम्यान यंदाच्या कार्तिकी वारीवर कोरोनाचे सावट असणार आहे. परिणामी आळंदीत वारक-यांना अद्याप प्रवेशबंदीचा आदेश नसला तरी आणखी काही दिवसांत वारी रद्द होण्याचा निर्णय सरकारकडून जाहिर केला जाण्याची शक्यता वारकरी संप्रदायातून बोलली जात आहे. नुकतेच पंढरपूरला दिंड्या तसेच वारक-यांना संचारबंदी लागू केली. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी वारीलाही परंपरेने समाधीवर होणारे नित्योपचार, पवमानपुजा, जागर, किर्तन केले जातील.मोजक्याच वारक-यांच्या उपस्थीतीत मंदिरात कार्यक्रम होतील.

दरम्यान, देऊळवाड्याच्या बाहेर मात्र नेहमीप्रमाणे वारक-यांची गर्दी नसणार आहे. आठवडाभर आळंदीत वारक-यांचा मुक्काम असतो. वारक-यांच्या भजन किर्तनाने अवघी अलंकापूरी, इंद्रायणीचे दोन्ही काठ, गोपाळपूरा दुमदुमुन जात असतात. यंदा मात्र वारक-यांचा माउलीनामाचा जयघोष आणि टाळमृदगांचा निनाद मात्र मोठ्या प्रमाणात नसणार आहे. आगामी दिवसांत वारीबाबत शासन काय भूमिका घेणार, किती वारक-यांना शहर प्रवेश आणि मंदिर प्रवेश देणार याबाबत वारक-यांबरोबर आळंदीकरांनाही कुतुहल आहे.

कार्तिकी काळात माऊलींच्या समाधीचे थेट दर्शन होत असे. मात्र यंदाच्या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी काळात स्पर्श दर्शन होणार नाही. याबाबत राज्यशासनाच्या निर्देशनानुसार दर्शन, मंदिर प्रवेश आणि नगरप्रदक्षिणा, रथोत्सवाबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. कार्तिकी वारी चुकणार तरी वारक-यांनी घरात बसून नामस्मरण करण्याचा मानस बोलून दाखवत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदीकर म्हणतात वारी नको...
कोरोनाची दुसरी लाट येत आहे. आळंदीत सध्या दररोज रूग्ण आढळून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करून वारीचे नियोजन मोजक्याच वारक-यांच्या उपस्थीतीत करावे, अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदी देवस्थानकडे केली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com