
पीएमपी बस सुरू करून विद्याथ्यांची गैरसोय दूर करावी
उंड्री - कोरोनाचा (Corona) ज्वर कमी झाला आणि शाळा सुरू झाल्या मात्र, स्कूलबस (Schoolbus) नसल्यामुळे पालकांना दररोज मुलींना शाळेत (School) ने-आण करावी लागत आहे. अटल बससेवा पाच रुपयांत पाच किमी बसप्रवास सामान्यांसाठी वरदान ठरत आहे. नव्याने समाविष्ट केलेल्या उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कामगारवर्गाची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
शहर उपनगरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी पाच रुपयांत हडपसर-उंड्री बस सामान्यांना वरदान ठरली आहे. प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, बसच्या फेऱ्या वाढवून विद्यार्थी, महिला, कामगार, कष्टकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
आनंद खेडकर, गोरख कानगे, पूनम शिंदे, राणी फरांडे, भगतसिंग कल्याणी, जालिंदर राऊत, संतोष शिंदे, विठ्ठल राऊत, नवनाथ कुदळे म्हणाले की, कोरोना महामारीनंतर शाळा सुरू झाल्या असून, स्कूलबस बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. फुरसुंगीतील संकेत पार्क परिसरात मोठी शाळा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना हडपसर परिसरातील शाळेत जावे लागते. काळेबोराटेनगर रेल्वे गेटपासून संकेत विहारपर्यंत जाण्यासाठी रिक्षावाले येत नाहीत, आले तर मनमानी भाडेआकारून लूट करीत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपी बस प्रशासनाने सुरू करावी, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ;महापौर मुरलीधर मोहोळ
रुपाली पाटील यांनी पीएमपी प्रशासनाने एकेकाळी सुरक्षित प्रवास पीएमपीचा प्रवास अशी जाहिरात केली होती. याची आठवण करून दिली. हक्काचे आणि सुरक्षित वाहन म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून पीएमपी बसकडे पाहिले जाते. पीएमपी बस रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहिली, तर या परिसरातील महिला-मुली सुरक्षित प्रवास करतील. संकेत विहार ते हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन अशी पीएमपी बससेवा सुरू करावी, असे त्यांनी सांगितले.
सतीश ननावरे म्हणाले की, कोरोनामुळे मागिल दोन वर्षे मुले-मीली शाळेत गेले नाहीत, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, स्कूलबस किंवा पीएमपी बस नसल्यामुळे अनेक मुलांना पायपीट करावी लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक विठ्ठल राऊत म्हणाले की, प्रवाशांची संख्या जास्त असून, पीएमपी बसेसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे बसमध्ये प्रवाशांची खच्चून गर्दी होते. त्यामुळे ज्येष्ठ, अपंगांना उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने पीएमपी बसेसच्या फेऱ्या वाढवून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.
हडपसर पीएमपी आगारप्रमुख सुभाष गायकवाड म्हणाले की, पाच रुपयांत पाच किमी अटल बससेवेचा मागणीनुसार बस मार्गावर प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून सर्वे केला जातो. त्यानंतर वरिष्ठांकडून निर्णय घेतला जातो. शाळा सुरू झाल्या असून, प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर बसेस वाढविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
Web Title: Inconvenience Students Removed By Starting Pmp Bus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..