रावेत बंधाऱ्याची उंची वाढविणार

रावेत बंधाऱ्याची उंची वाढविणार

पिंपरी - शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या रावेत बंधाऱ्याची उंची वाढविण्यात येणार आहे. त्याचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले असून, या आठवड्यात ते जलसंपदा विभागाकडे सुपूर्त करण्यात येईल. बंधारा गाळाने भरला असून, तो काढल्यास तेथील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.

पावसाळ्यात पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. त्या वेळी बंधाऱ्याजवळ अडलेल्या पावसाचे पाणी पंपिंगद्वारे उचलून घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने त्या बाबतचा निर्णय दोन वर्षांपूर्वी दिला. पवना धरणातून आठ महिने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यामुळे, रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे.

हा बंधारा शंभर वर्षांपूर्वीचा असल्याने गाळाने भरला आहे. काही ठिकाणी तो नादुरुस्तही झाला आहे. त्यामुळे तो पाडून तेथे नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन होता. दहा वर्षांपूर्वीच तो बांधण्याबाबतचा आराखडा तयार झाला होता. त्या वेळी त्याचा अंदाजे खर्च सुमारे ४० कोटी रुपये होता. त्यानंतर पवना जलवाहिनीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतल्यामुळे बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव मागे पडला. गेल्या वर्षीपासून ‘सकाळ’ या विषयाचा पाठपुरावा करीत आहे. बंधारा नवीन बांधायचा की, आहे त्याचीच दुरुस्ती करायची, याबाबत महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे. नवीन बंधाऱ्यासाठी सुमारे ८० कोटी रुपये, तर दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. 

सध्याच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंढे यांच्यात एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उंची किती वाढवायची, यासाठी बंधाऱ्याच्या परिसराचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर गाळ काढण्याचेही ठरले. ती दोन्ही कामे महापालिकेतर्फे करण्यात येणार होती. सर्वेक्षणासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. 

शहरातील गेल्या महिन्यातील पाणीटंचाईच्या समस्येमुळे बंधाऱ्याच्या विषयाला पुन्हा गती मिळाली आहे. बंधाऱ्यापाशी पुरेसे पाणी मिळत नसल्याची महापालिकेची तक्रार आहे, तर बंधाऱ्यावरील पाणी वाहून जात असल्याचा जलसंपदा विभागाचा मुद्दा आहे. महापालिकेकडून सर्वेक्षणाच्या कामाला उशीर होत असल्याबद्दल जलसंपदा विभागाने नाराजी व्यक्त केली. जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्या वेळी ‘रावेत बंधारा गाळाने भरला असून, तो तातडीने काढावा, तसेच बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी सर्वेक्षण करून अहवाल द्यावा,’ अशी सूचना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी केली. 

महापालिकेने बंधाऱ्याची उंची किती वाढवायची त्याचा निर्णय घेतल्यास, काम तातडीने करता येईल. सर्वेक्षणानंतर एक की, दोन मीटर उंची ठेवायची, याचा निर्णय घेता येईल. उंची वाढविली व गाळ काढला, तर पाणी साठवण क्षमता वाढेल. शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होईल.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

रावेत बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल या आठवड्यात जलसंपदा विभागाला सादर करण्यात येईल. बंधारा व पंपिंग स्टेशन या परिसरातील नदीपात्रातील गाळही काढण्यात येईल.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com