IND vs Pak: टी-२० विश्‍वकरंडकातील पाकिस्तानचे आव्हान धोक्यात, भारताने कसं फिरवलं पारडं ?

पाकिस्तानवर आता साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढावू शकणार आहे.
IND vs Pak
IND vs Pakesakal

न्यूयॉर्क, ता. ९ : भारतीय क्रिकेट संघाचे टी-२० विश्‍वकरंडकातील पाकिस्तान संघावरील वर्चस्व यंदाच्या स्पर्धेतही कायम राहिले. जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानी संघावर सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाचा टी-२० विश्‍वकरंडकातील ‘अ’ गटामधील सलग दुसरा विजय ठरला. रोहित शर्माच्या सेनेने सुपर आठ फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. पाकिस्तानवर आता साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढावू शकणार आहे.

IND vs Pak
Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम

मदत करणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करायला मिळाल्याचा फायदा पाकिस्तानी गोलंदाजांनी घेतला. भारतीय फलंदाजांनी टप्पा पडून थांबून येणाऱ्या चेंडूवर झेलबाद होण्याचा सपाटा लावला. खराब फलंदाजीमुळे भारताचा संपूर्ण डाव १९ षटकांत ११९ धावांमध्ये गुंडाळला गेला.

दुसऱ्या डावात मैदानावर ऊन पडल्याने आणि दोन डावांमध्ये केलेल्या जड रोलरच्या रोलींगने खेळपट्टीचा स्वभाव नरमला. मोहम्मद रिझवानने खेळपट्टीचे आव्हान लक्षात घेऊन शांतपणे फलंदाजी करत ३१ धावा केल्याने आव्हान बराच काळ कायम होते. बुमराने रिझवानला बाद केल्यावर बाकी पाकिस्तानी फलंदाजांना तंत्र दाखवत फलंदाजी करणे झेपले नाही.

भारतीय गोलंदाजांनी हाती आलेला लगाम चांगलाच पकडून ठेवत पाकिस्तानी फलंदाजांना ७ बाद ११३ धावांवर रोखून ६ धावांचा जबरदस्त विजय मिळवला. ३ फलंदाजांना बाद करणारा जसप्रीत बुमरा सामन्याचा मानकरी ठरला. सलग दुसऱ्या सामन्यातील पराभवाने पाकिस्तान संघाच्या स्पर्धेतील आव्हानाला मोठा धक्का लागला.

IND vs Pak
Ind vs Pak : शेवटच्या दोन षटकात हव्या होत्या 21 धावा... तरी पाकिस्तान आला गुडघ्यावर! हाय-व्होल्टेज सामन्याची रंजक कहानी

हलक्या पावसाच्या सरींमुळे हवेत आलेला गारवा दोनही कप्तानांना नाणेफेकीसाठी घेऊन आला तेव्हा जिंकणारा कप्तान पहिली गोलंदाजी घेणार हे नक्की होते. संघात चार दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्याने बाबर आझमने नेमके तेच केले. रोहित शर्मा - विराट कोहलीची जोडी तरीही मोठ्या आत्मविश्‍वासाने मैदानात उतरली.

शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकात रोहितने मारलेला षटकार प्रेक्षकांत जाऊन पडला तेव्हा भारतीय प्रेक्षकांनी घसे साफ करून घेतले. काहीसा थांबून आलेल्या चेंडूवर कोहली आणि एक चौकार, एक षटकार मारून प्रेक्षकांची अपेक्षा वाढवणारा रोहित पुढच्या षटकात झेल देऊन परतला. चेंडू चांगला स्वींग होत असल्याने मोठे फटके मारणे कठीण जात होते. तरीही कसेही करून भारतीय फलंदाजांनी ६ षटकात ५० धावांचा टप्पा गाठलाच.

जम बसवायला थोडा वेळ घेणाऱ्या रिषभ पंतने हारीस रौफला एकाच षटकात तीन चौकार मारल्याने १० षटकांअखेर भारताच्या खात्यात ८१ धावा जमा झाल्या होत्या. भारतीय फलंदाज अडचणीतून मार्ग काढत १४० धावांचा टप्पा गाठणार वाटत असताना मधल्या फळीत पडझड झाली. ३ बाद ८९ धावांवरून ७ बाद ९६ धावसंख्या झाली. चार फलंदाज पाठोपाठ बाद झाले ज्यात ४२ धावा करणारा रिषभ पंतही होता. बरेचसे फलंदाज टप्पा पडल्यावर चेंडू थांबून आल्याने झेल बाद झाले. भारताचे सगळे फलंदाज वेगवान गालंदाजांना बाद झाले ज्यात 8 फलंदाज झेलबाद झाले. १९षटकात भारताचा डाव ११९ धावांवर आटोपला.

पाकिस्तानची फलंदाजी चालू होताना आकाशतील ढग दूर झाले होते गरम उन्हात मोठ्या रोलरने रोलींग केले गेल्याने खेळपट्टी बऱ्यापैकी स्थिरावली. मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझमने सकारात्मक सुरुवात करायचा प्रयत्न केला. त्यातून बुमराच्या गोलंदाजीवर रिझवानचा सोपा झेल शिवम दुबेने आणि अत्यंत कठीण कॉट अँड बोल्ड सिराजने बाबरचा झेल सोडला.

बुमराने कच न खाता परत एकदा बाबरला चकवले. सुर्यकुमार यादवने चांगला झेल पकडला आणि भारताला पहिले यश मिळाले. खेळताना बरेच चेंडू चकताना रिझवानने काही मोठे फटके मारल्याने अपेक्षित धावगती राखली गेली.

अक्षर पटेलने उस्मान खानला पायचित आणि आक्रमक पवित्रा घेणाऱ्या फखर झमानला हार्दिक पंड्याने बाद करून संघाला सामन्यात परत आणायचा प्रयत्न केला. शेवटच्या ६ षटकात ४० धावा हव्या होत्या आणि रिझवान ३१ धावांवर चांगला खेळत होता. बुमराने परत मारा करायला आल्यावर रिझवानला पहिल्या चेंडूवर बोल्ड केले. पुढच्या तीन षटकात कमी धावा दिल्या गेल्याने अपेक्षित धावगती ९च्या पुढे गेली आणि दडपण फलंदाजांवरचे वाढले.

अखेरच्या दोन षटकात १०.५०च्या सरासरीने २१ धावा करायचे आव्हान पाकिस्तानी फलंदाजांसमोर होते. रोहितने बुमराचे शेवटचे षटक अगोदर टाकून घेण्याचा निर्णय घेतला. बुमराने १९व्या षटकात फक्त ३ धावा देत इफ्तिकारला बाद केले. परिणामी अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावा करायचे आव्हान राहिले. अर्शदीपने शांतपणे मारा करून पाकिस्तानी फलंदाजांना रोखून धरले आणि भारतीय संघाने ६ धावांचा निर्णायक विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक ­­: भारत - १९ षटकांत सर्व बाद ११९ धावा (रोहित शर्मा १३, रिषभ पंत ४२, अक्षर पटेल २०, नसीम शाह ३/२१, हारिस रौफ ३/२१, मोहम्मद आमीर २/२३) विजयी वि. पाकिस्तान २० षटकांत सात बाद ११३ धावा (मोहम्मद रिझवान ३१, बाबर आझम १३, उस्मान खान १३, फखर जमान १३, इमाम वासीम १५, जसप्रीत बुमरा ३/१४, हार्दिक पंड्या २/२४).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com