संकटांनी शिकविले जगायला

Kumudini-Kedari
Kumudini-Kedari

वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे. 

मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच लागते. ह्याच रीतीने माझ्या आयुष्याची पुढील गाठ एका सुसंस्कृत कुटुंबातील म्हणजेच वाडा (ता. खेड) येथील सुनील अनंतराव केदारी यांच्याशी बांधली गेली. सासरकडे एकत्रित कुटुंब होते, हे वातावरण माझ्यासाठी वेगळे होते, तरीही सासरे अनंतराव गुणाजी केदारी यांनी माझ्यावर राजकीय, तसेच सामाजिक जबाबदारी सोपवली. माझे सासरे गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पश्‍चिम विभागाचे सल्लागार होते. त्यांच्या या वाटचालीत माझ्या पतीची, तसेच कुटुंबाची साथ होती. सर्व व्यवस्थित चाललेले असतानाच आमचे वाडा गाव चासकमान प्रकल्पामुळे विस्थापित झाले. 

विस्थापनामुळे संसार नव्याने सुरू करायचा होता. पती सुनील यांनी नव्याने पुन्हा व्यवसायाची सुरवात केली. आयुष्याच्या या हिंदोळ्यावर संसाराची नाव भरकटू न देण्यासाठी आता नावेचे शिड पकडणे मलाही गरजेचे होते. कारण, आत्ता दिशा नाही दिली, तर संसाराचे जहाज व सर्व काही भरकटणार होते.

कष्टाच्या बळावर, हितचिंतकांच्या आशीर्वादाने व घरच्या सदस्यांच्या पाठिंब्याने व्यवसाय पुन्हा नेटाने उभा राहिला. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर पती सुनील यांनीही गावचे सरपंचपद भूषविले. अनेक सामाजिक उपक्रमांना चालना दिली. यात सासऱ्यांच्या नैतिकतेचा व सामाजिकतेचा वारसा तळागाळापर्यंत पोचविला. यशाच्या या शिखरावर असताना पती सुनील यांनी सर्वांना पोरके करून या जगाचा निरोप घेतला. सर्वांचे छत्र हरपले, माझ्यासाठी हा आघात तर अशक्‍यप्राय, अशा वेदनांनी भरलेला आणि न पेलण्यासारखा होता. मी पूर्णपणे ढासळले होते. माझ्या डोळ्यांदेखत कुटुंबही ढासळताना दिसत होते, व्यवसायही तोट्याकडे जाऊ पाहत होता, आयुष्य मला व माझ्या कुटुंबाला बोथट करू पाहत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर आला तो राखेतून भरारी घेणारा फिनिक्‍स पक्षी. जो मला माझ्या पतीच्या रूपात खुणावत होता, सांगत होता तुला परिस्थितीपुढे बोथट नाहीतर कणखर बनायचे आहे. स्वतःला विसरून सर्वांची शक्ती बनायचे आहे. मीही नावेचे शिड धरून येणाऱ्या प्रलयाला सामोरे जायचे ठरवले आणि सुरू झाला संघर्षमय प्रवास. कुटुंबाची व हितचिंतकांची मोलाची साथ होती. पण, सासूबाई शांताबाई या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. 

व्यवसायाची घडी बसविण्याचे आव्हान मी प्रथम स्वीकारले. त्यासाठी मुलांची व पुतण्यांची साथ लाभली. हे सर्व सांभाळत असताना मुलांनाही उच्चशिक्षित केले. कुटुंबाची जबाबदारीही त्याच हिमतीने पार पाडताना सामाजिक भान राखून सर्वप्रथम ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक स्वावलंबत्व, तसेच महिला सबलीकरणाचे कार्यक्रम राबवले. पतीच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य झाले. गावाचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या स्कूल कमिटीमध्ये कार्यरत झाले. मागील नऊ वर्षांपासून पती सुनील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून शेकडो वधू-वरांचे संसार उभे राहिले आहेत. यासाठी गावाबरोबरच कुटुंबाचीही मोलाची साथ लाभली. काही कटू प्रसंगामध्ये मला आध्यात्माची साथ महत्त्वाची ठरली. त्यातूनच आज गावात विविध आध्यात्मिक, तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. 

संकटे अनेक आली, पण चिकाटी, सचोटी व आत्मविश्वास यापुढे ती खुजीच ठरली. सर्व स्त्री वर्गाला हेच सांगणे आहे, की कोणतीही लढाई अर्ध्यावर सोडू नका, तुमच्यातही ती शक्ती आहे की जी सर्व अशक्‍यांना शक्‍य बनवेल. फक्त प्रत्येक आव्हानांना तोंड देताना चांगले व्यवस्थापन करा, प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता विकसित करा, आपले घर, व्यवसाय तसेच समाज यात योग्य समतोल साधा.  तुम्हीही आदिशक्तीचे रूप आहात आणि संकटाच्या-आव्हानांच्या महिषासुराचे मर्दनही तुमच्याच हातात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com