पुणे: जम्मू-काश्मीरचा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आणि जटिल असल्याने कधीही सुटू शकणारा नाही, असे सोयीचे राजकीय चित्र निर्माण करण्यात आले होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत हा प्रश्न घटनेने आखून दिलेल्या चौकटीत सोडविला,’ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
‘कलम ३७० : नेहरूंपासून मोदींपर्यंत’ या सोमेश कोलगे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, ‘‘कलम ३७० हटवून जम्मू-काश्मिरात भारतीय संविधान पूर्णतः लागू करण्याचा निर्णय सहजासहजी झाला नाही. कलम ‘३७० आम्ही पुन्हा लागू करू किंवा ३७० विषयीचा निर्णय प्रक्रियेचे पालन करून झालेला नाही,’ अशा वल्गना करणाऱ्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.’’
भांडारी म्हणाले, ‘‘मराठीमध्ये आपले संविधान, संविधानिक इतिहास, घडामोडी अशा विषयांवर फारसे लेखन होत नाही. युवा लेखकांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून विपुल लेखन करण्याची गरज आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.