परीक्षा घेण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात, 'विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता...!'

Students_Exams
Students_Exams

पुणे : विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता योग्य ती दक्षता घेऊन परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, याबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करण्यात यावा, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

विद्यापीठ विकास मंचाच्या वतीने 'कोविड पार्श्वभूमी- परीक्षेला पर्याय काय' विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, "महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात अशा आपत्तीचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी सर्व कुलगुरूंची एकत्रित बैठक घ्यावी. आताच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारे लेखी परीक्षा शक्य नसली तरी, सर्व परीक्षा (प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष) तोंडी घेता येतील. अशा पद्धतीने परीक्षा घेतल्यास परीक्षेचा वेळ वाचेल. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तोंडी परीक्षेचा पर्याय संयुक्तिक ठरणार आहे."

प्रोग्रसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, "परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी दिल्यास या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होणार नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि पारंपारिक अभ्यासक्रम अशी विभागणी करून परीक्षा घ्याव्यात. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यापूर्वी झालेल्या सत्रातील सरासरीवर मूल्यमापन व्हावे. तसेच मेरिट घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आणि हक्क आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल अशी सोय द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना गुण वाढवायची संधी देखील द्यावी."

"परीक्षा घ्यायची असेल तर  त्या कमी वेळेच्या आणि काही वेळ प्रतीक्षा करून उशिरा घ्यावी. परंतु हा निर्णय घेताना विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांच्या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे."
- डॉ. सुधाकर जाधवर (सदस्य, विद्या परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

"गुणवत्ता सांभाळत अंतर्गत मूल्यमापन या आधारे पुढे कसे जाता येईल, याचा विचार करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि परीक्षा यंत्रणेवर येणारा ताण कमी कसे करत येईल, हे पाहावे."
- डॉ. कान्हु गिरमकर (अध्यक्ष, प्राध्यापक संघटना)

"सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. एकदा परीक्षा होणार, असे जाहीर केल्यास विद्यार्थी परीक्षेची तयारी करू लागतील. मग परीक्षा कशी घ्याव्यात, याचा निर्णय द्यावा."
- सुवर्णा रावळ (सदस्य, व्यवस्थापन परिषद, एसएनडीटी महिला विद्यापीठ)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com