
Kasba By-Election: लोकशाहीत फक्त सर्वसामान्यांचा बालेकिल्ला; पटोलेंचा टोला
पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा खेळ आता हळूहळू रंगात यायला लागला आहे. या ठिकाणी भाजपला काँग्रेसनं आव्हान दिलं आहे. कसबा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण लोकशाहीत फक्त सर्वसामान्यांचा बालेकिल्ला असतो असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Kasba By Election balekilla in Democracy Only for Common people)
पटोले म्हणाले, "आज पंतप्रधान मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. यांनीच नेमलेले न्यायधीश असतील तर आम्हाला कसा न्याय मिळणार? फडणवीस किंवा शहा यांचे पोलीस असो न्यायाची लढाई आम्ही लढणार आहोत. आज अनेक माध्यमं इथे आली आहेत. मालकाविरोधात आम्ही बोलत आहोत त्यामुळं माझी प्रतिक्रिया माध्यमं दाखवणार नाहीत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ देखील या लोकांनी काबीज केला आहे. याविरोधात आपल्याला आता कसबा पोटनिवडणूकीतून दाखवून द्यायचं आहे. कसबा हा बालेकिल्ला आहे पण लोकशाहीमध्ये सामान्यांचा बालेकिल्ला असतो"
एलआयसीबाहेर आम्ही आंदोलन केलं पण त्यांनी गेट बंद केलं. अदानींनी खोट्या कंपन्या तयार केल्या आमि या एलआयसीमधून त्यांनी पैसे घेतले. आज अनेक ठिकाणी उपासमार सुरु आहे पण देशात दोन जण श्रीमंत आहेत. याविरोधात बोलताना लोकसभेत राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यात आला. त्यांचा माईक बंद करण्यात आला.
मोदी सरकार मित्राला वाचून काय मिळणार? या लोकशाहीमधून त्यांना काय मिळणार आहे. जनतेच्या पैशाचा हिशोब मोदी आणि आरएसएसला द्यावाच लागेल. अदानींना पकडण्याची हिंमत तुमच्यामध्ये नाही. आज न्यायाधीश निवडण्यावरुन न्याय व्यवस्था आणि केंद्र सरकारमध्ये भांडण सुरु आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले.
देश उभा करण्यासाठी काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. खोटं स्वप्न दाखवून २०१४ मध्ये मोदी नावाच्या व्यक्तीला उभा करून संघानं आणि भाजपनं षडयंत्र रचलं. देशातील लोकांनी बहुमताचं सरकार निवडून दिलं. खोटं बोलून पण रेटून बोलणं, जाती धर्माच्या नावाखाली लढून भाजपनं सरकार आणलं. नोटबंदी, जीएसटी यासारख्या गोष्टी भाजपनं केल्या आणि सर्वसामान्य लोकांचे पैसे जमा करून त्यांनी त्यांच्या मित्राकडं देण्याचं काम केलं.
२०१४ मध्ये मोदींनी स्टॅलिनचा उल्लेख केला. मोदींनी त्यांचा उल्लेख का केला कारण स्टॅलिनचा भयानक विचार त्यांना मान्य होता. स्टॅलिननं सत्त्ता ठेवण्यासाठी रशियातील मुस्लिमांना त्रास दिला. विरोधी पक्षांना संपवण्याचं काम केलं, असा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.