पावसाअभावी खरीप अडचणीत

पावसाअभावी खरीप अडचणीत

पुणे - राज्यात खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपल्या असून, अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आलेली आहेत. बीड, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदुरबार भागांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नगर जिल्ह्याच्या काही भागांत तर पिके सुकू लागली आहेत.

राज्यात एक जून ते २७ जुलैपर्यंत फक्त १७ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जादा पाऊस झाला आहे. यात गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेडला तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांत चांगला पाऊस झालेला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नगर, कोल्हापूर, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलदाणा, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूरला ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. राज्याच्या ९ तालुक्यांमध्ये ५० टक्केदेखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील पिके धोक्यात आहेत. 

धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात शेतकऱ्यांनी मका, कापूस, ज्वारी, बाजरीची पेरणी आटोपली आहे; मात्र पाण्याचा ताण बसत असल्यामुळे पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी यंदा उधार उसनावारी करून खरिपाची तयारी केलेली आहे. त्यात पुन्हा पाऊस नसल्यामुळे काही भागांत दुबार पेरण्यांचे संकट असल्याचे सांगितले जाते. 

उत्तर महाराष्ट्रातील १४ तालुक्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. खानदेशात बागायती कापूस फूल पाते लागण्याच्या स्थितीत, तर जिरारायती भागात वाढीच्या अवस्थेत कपाशी आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यांतील पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत. या गोंधळात भर म्हणजे काही भागांत कीड-रोगांनीदेखील डोके वर काढले आहे. राज्याच्या काही ऊस उत्पादक पट्ट्यांमध्येदेखील पावसाचा ताण बसला आहे. दमदार पावसाअभावी उसाची वाढ खुंटल्यामुळे गेल्या हंगामाइतकी उत्पादकता चालू हंगामात मिळण्याची आशा सध्या तरी दिसत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पावसाअभावी पिके धोक्यात आल्याचे अहवाल अजून कुठून झालेले नाही. नंदुरबार भागात पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस कमी असला, तरी मुळात हा भाग रब्बी हंगामाचा आहे. विदर्भात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. 

पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिके धोक्यात आल्याबाबत राज्याच्या कोणत्याही भागातून माहिती आलेली नाही. खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. काही भागांमध्ये पावसाचा ताण असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. पावसाचे दिवस अजून संपलेले नाहीत.
- विजय घावटे, कृषी विस्तार संचालक, कृषी आयुक्तालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com