खोरोची बंधारा फुटला अन् शेतकऱ्यांच्या अश्रूंचाही बांध सुटला...

खोरोची बंधारा फुटला अन् शेतकऱ्यांच्या अश्रूंचाही बांध सुटला...

वालचंदनगर : खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा खांब कोसळल्याने बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बंधाऱ्यातील पाणी वाहून जात असल्याने शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. 

खोरोची येथे नीरा नदीवरती कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा आहे. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे बंधाऱ्याचे नुकसान झाले होते. तसेच एक खांब ही तुटला होता. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती केली होती. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यामध्ये उशिरा ढापे टाकल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा कमी होता. याचे 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बंधाऱ्यामध्ये पाटबंधारे विभागाने पाणी सोडले होते. सध्या बंधारा पूर्ण क्षमतेने भरला हाेता. मात्र गुरुवार (ता. १४) रोजी रात्री अचानक बंधाऱ्याचा एक खांब तुटल्याने ढापे वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले.

गावातील नागरिकांना बंधारा फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. बंधाऱ्यातील  वाया जात असलेले पाणी पाहून शेतकऱ्यांचे डोळेही पाणावले. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी वाया जात होते. शेतकरी पाण्याची गळती रोखू शकत नसल्याने हतबल झाले होते. हताश होवून वाहून जाणारे पाणी पाहत बसले होते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी पोहचले होते. त्यांनीही बंधाऱ्याची दुरुस्ती करुन पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारपर्यंत यश आले नव्हते. पाणी गळती रोखण्यासासाठी अधिकारी व शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
खोरोचीच्या बंधाऱ्याचा फायदा पुणे व सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना होत आहे. सुमारे तीन-चार हजार एकर शेती बंधाऱ्याच्या पाण्यावरती अवलंबून आहे. चालू वर्षी बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने नीरा नदीकाठ शेतकऱ्यांनी गहू, कांदा, उस व इतर पिकांचे नियोजन केले होते. मात्र बंधाऱ्यातील पाणी वाया जावू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

... शेतकऱ्यांनी केला होता खर्च
बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे ढापे टाकण्यास उशीर झाल्यामुळे बंधाऱ्यामध्ये कमी पाणीसाठा होता. सोनाली दुध संकलन केंद्राचे अध्यक्ष व शेतकरी यांनी ७० ते ८० हजार रुपये खर्च करुन कालव्याचे पाणी बंधाऱ्यामध्ये सोडून बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत केली होती. मात्र बंधारा फुटून पाणी वाहून गेल्याने दादासाहेब भाळे, बाळासाहेब भाळे व बापूराव पाटील या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. सर्व शेतकरी हताश होवून बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी व दुरुस्तीच्या कामाची वाट पाहत बसले  होते. 

खांब तुटल्यामुळे पाणी गेले वाया...खोरोचीचा बंधारा हा ३० ते ३५ वर्ष जुना आहे. बंधाऱ्याचे खांब जीर्ण झाले असून, गेल्या तीन महिन्यांपूर्वी एक खांब तुटला होता. त्याची दुरुस्ती केली आहे. मात्र त्याच्या शेजारील खांब तुटल्यामुळे बंधाऱ्यातून पाणी वाया जात असल्याचे पाटबंधारे विभागाचे निमगाव शाखेचे उपअभियंता विजय यादव यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com