चिमुकल्यांचे हरपले आईवडिलांचे छत्र...समाजाकडून मिळाली मायेची पाखर... 

kunjirwadi
kunjirwadi

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील कुंजीरवाडी येथे पाच दिवसांपूर्वी नवीन उजवा मुठा कालव्यात बुडणाऱ्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा मृत्यू झाला; तर वडील वाहून गेल्याने बेपत्ता झाले. त्यामुळे चार चिमुकले अनाथ झाले. या परप्रांतीय चिमुकल्यांचे काय होणार, याची चिंता होती. त्यावेळी कुंजीरवाडी ग्रामस्थांनी त्यांना आपल्या घरातील मुलांप्रमाणे मायेचा आधार दिला. 

सात ते बारा वर्षे या दरम्यान वय असलेली ही चार मुले, त्यात अधिकची गंभीर बाब म्हणजे परप्रांतीय कुटुंबातील. त्यामुळे चार मुलांचे काय होणार होणार, हा यक्ष प्रश्न मुलांचे उत्तर प्रदेशात असणारे नातेवाईक, लोणी काळभोर पोलिस, ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी व पत्रकार यांना भेडसावत होता. त्यावेळी या मुलांना गेल्या पाच दिवसांत कुंजीरवाडीचे पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, कोरेगाव मूळ येथील नर्सरी उद्योजक बाप्पू शितोळे, कुंजीरवाडी येथील उद्योजक राजू गुजांळ व कुंजीरवाडी येथील गावकऱ्यांनी मायेचा हात दिला. 

कुंजीरवाडी येथे नवीन उजवा मुठा कालव्याच्या पाण्यात पोहत असताना कालव्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात सोनी कश्‍यप (वय 38, रा. सध्या कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळगाव गौसगाव, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) या महिलेला जीव गमवावा लागला होता; तर त्यांचे पती अशोक कश्‍यप (वय 40) हे कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने अद्यापही बेपत्ता आहेत. मात्र, त्यांचे राज (वय 11), रजनी (वय 9), रणजित (वय 7) व निसू (वय 6), ही चार मुले अनाथ झाली. त्यांचा एकही नातेवाईक कुंजीरवाडी अथवा जिल्ह्यात नाही. त्यामुळे या चार मुलांचे काय होणार, हा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. त्यातच सोनी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासही अशोक हिच्या आईने नकार दिला. त्यामुळे कुंजीरवाडीचे पोलिस पाटील मिलिंद कुंजीर व त्यांचे सहकारी महेश कुंजीर, अमोल खेडेकर, अतुल जवळकर व सुरेश झेंडे यांनी सोनी हिच्यावर अंत्यंसंस्कार केले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गेल्या पाच दिवसांत मिलिंद कुंजीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चारही मुलांची काळजी अगदी जवळच्या नातवाईकासारखी घेतली होती. तसेच, अशोक याच्या मुळगावी मुलांच्या शाळेची व राहण्याची सोय होणार नसेल; तर शाळा व राहण्याची सोय करण्याची तयारीही कुंजीरवाडी ग्रामस्थांनी दाखवली होती. मात्र, मुलांच्या आजीने मुलांना गावी पाठवून देण्याची विनंती केली. त्यामुळे या चारही मुलांना अशोक यांच्या गावाकडील दोन कुटुंबांना मदतीसाठी देऊन बुधवारी (ता. 20) रात्री उरुळी कांचन येथून रेल्वेने रवाना केले. 

मिलिंद कुंजीर यांनी या चार मुलांना पाठवताना आजीसह पाच जणांना तीन महिने पुरेल एवढा; तर गावी घेऊन जाणाऱ्या दोन कुटुंबांनाही एक महिना पुरेल एवढे धान्य दिले. तसेच, मुले घरी पोचल्यावर पैशाची चणचण लागू नये, यासाठी मुलांकडे पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, कोरेगाव मूळ येथील नर्सरी उद्योजक बाप्पू शितोळे यांनी रोख रक्कमही दिली. त्यामुळे चार परप्रांतीय मुलांना नियतीने अनाथ केले असले; तरी कुंजीरवाडी ग्रामस्थांनी तारले, असेच म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com