Pune News : लोकसभेच्या तोंडावर राज्य सरकारने पुण्याच्या पूर नियंत्रणासाठी दिले २०० कोटी

पुणे शहरात साडेचार वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याच्या परिसरातील अनेक ठिकाणी सीमा भिंतीपडून मोठे नुकसान झाले होते.
State-Government
State-Governmentsakal

पुणे - शहरात साडेचार वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याच्या परिसरातील अनेक ठिकाणी सीमा भिंतीपडून मोठे नुकसान झाले होते. पण महापालिकेला या ठिकाणी निधी खर्च करण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे आता या कामासाठी राज्य सरकारने विशेषबाब म्हणून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कात्रज पासून तो नवी पेठेपर्यंत ज्या ठिकाणी सीमा भिंती पडल्या आहेत, तेथे महापालिका सीमाभिंत बांधून देणार आहे.

पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला पूर आला. वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक सोसायट्यांच्‍या सीमा भिंत पडल्या, २० पेक्षा अधिक जणांचा यामध्ये बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंतीसह नवीन पूल (कलव्हर्ट) बांधण्याचे काम हाती घेतले होते. पण काही ठिकाणी काम करताना महापालिकेला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सीमा भिंत बांधता येत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी द्यावा असा प्रस्ताव दिला होता.

हा निधी मिळावा यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. यासंदर्भात राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद म्हणून २०० कोटी रुपये देण्याचा आदेश मंगळवारी (ता. २७) काढला आहे. मोहोळ यांनी आज (ता. २८) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली.

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे शहरातील पूर नियंत्रण आणि सीमा भिंती बांधण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे. याचा प्रस्ताव पाठविल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी लगेच मान्य केली आणि निधी देण्याचा आदेश काढला आहे. त्याचा विशेष फायदा आंबिल ओढा परिसरात होणार आहे.

भाजपला राजकीय फायदा

ढगफुटीनंतर महापालिकेकडून मदत न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी होती. कात्रजपासून ते नवी पेठ या दरम्यान आंबिल ओढ्याच्या लगतच्या प्रभागातून भाजपचे २३ नगरसेवक निवडून आलेले होते. तसेच पर्वती विधानसभा व पुणे लोकसभा मतदारसंघात या भागाचा समावेश आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्य सरकारने २०० कोटीचा निधी मंजूर करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कात्रज कोंढव्‍याचा निधी कधी?

कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये महापालिकेला देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. हा निर्णय होऊन तीन आठवडे उलटून गेले तरी हा निधी अद्याप महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे भूसंपादनाचे काम ठप्प आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com