खेड आळंदी : दिलीप मोहिते आघाडीवर, शिवसेनेपेक्षा अपक्ष भारी

khed-aalandi.jpg
khed-aalandi.jpg

राजगुरुनगर (पुणे)  : खेड आळंदी मतदारसंघाच्या सहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते 3721 मतांनी आघाडीवर आहेत. खेड आळंदी मतदारसंघात सहाव्या फेरीत दिलीप मोहिते यांना 17443, अपक्ष अतुल देशमुख यांना 13722, तर शिवसेनेच्या सुरेश गोरे यांना 7331 मते मिळाली आहेत. 

या मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणेच उत्साहात मतदान झाल्याने मतदानाची सरासरी 67 टक्‍क्‍यांवर गेली आहे. चुरशीची तिरंगी लढत झाल्याने मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत मतमतांतरे राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळचा कोणाचाही विजय मोठ्या फरकाने होणार नाही, या मताशी सर्व राजकीय जाणकार सहमत आहेत. 

गेल्या वेळी मतदारसंघात 70.68 टक्के मतदान झाले होते. या वेळी 67.27 टक्के मतदान झाले. जरी तीन टक्के मतदान कमी झाले असले तरी मतदार वाढल्याने ते गेल्यावेळेपेक्षा जास्त आहे. गेल्या वेळी मतदान 2 लाख 193 होते, तर या वेळी 2 लाख 20 हजार 165 एवढे आहे. निवडणुकीतील चुरस पाहता, निवडून येणाऱ्या उमेदवारास 90 हजारांच्या आसपास मते पडण्याची गरज आहे.   

मतदारसंघात सुरवातीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिलीप मोहितेंची आघाडी दिसत होती. मराठा आरक्षण आंदोलन आणि शरद पवारांबद्दल वाढलेली सहानुभूती यामुळे त्यांना पाठिंबा मिळत होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यावर राष्ट्रवादीचे मोहिते आणि शिवसेनेचे सुरेश गोरे असा सामना रंगणार असे चित्र दिसत होते.

मात्र, युवकांचा पाठिंबा, भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांना वाढू लागला. कोणी नेता नसतानाही आळंदी आणि राजगुरुनगर येथील त्यांच्या सभा मोठ्या झाल्याने तेही स्पर्धेत आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशमुखांच्या पारड्यातही भरघोस मते पडल्याची चर्चा आहे. पण ही मते त्यांना विजयापर्यंत नेऊ शकणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

कारण तालुक्‍याचा आजवरचा इतिहास पाहता कितीही हवा झाली, तरी प्रत्यक्ष मतदानात अपक्ष उमेदवार कमी पडतो, असे याआधी सिद्ध झाले आहे. मात्र, त्यांना पाठिंबा वाढल्याने अन्य दोघांची गणिते बिघडली. देशमुखांकडे जाणारी मते कोणाची, याबाबत मतमतांतरे आहेत. पण त्यांचा फटका बसणारा पराभूत होणार हे निश्‍चित आहे. 

प्रचाराच्या आघाडीत काहीशा मागे राहिलेल्या गोरे यांनी नंतर सातत्याने प्रयत्न करून कसर भरून काढली. शेवटच्या दिवसापर्यंत हळूहळू वेग वाढवत नेऊन आपला टक्का वाढविला आणि सुरक्षित टप्पा गाठला. तो त्यांना विजयापर्यंत नेणारा ठरणार का? हे आता लवकरच स्पष्ट होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com