विधानसभा 2019 : पिंपरी - महायुती आणि महाआघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी शहराच्या विकासाची दिशा काय असेल, याची माहिती देणारा जाहीरनामा अद्याप प्रकाशित केलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अवघा पाच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार याबाबत काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या प्रमुख पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. मात्र, शहराचा विकास करताना त्यात कोणत्या गोष्टींना महत्त्व देणार याची माहिती मतदारांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात निवडणूक लढविणारे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तो प्रकाशित करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तसे झालेले नाही.
सध्या सुरू असणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय मुद्द्यांवर सर्वाधिक भर दिला जात असल्याचे चित्र आहे. भविष्यात शहराचा विकास कसा करणार. त्याचे कसे नियोजन करणार. नागरिकांसाठी कोणत्या नव्या योजना मांडणार या मुद्द्यांवर राजकीय पक्ष आणि उमेदवार अपेक्षित भर देताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
जुने प्रश्न सुटणार का?
शहराशी संबंधित असणारे शास्तीकर, अवैध बांधकामे, रिंग रोड, पवना जलवाहिनी या प्रश्नांवर कायम चर्चा होत राहिली आहे. मात्र, ते अद्याप सुटलेले नाहीत. याशिवाय रस्त्यावरील खड्डे, सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न याचीही भर पडली आहे. औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या या शहरातील एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न, लघू उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या, इंद्रायणी आणि पवना नदी सुधारणा हे प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहराच्या विकासासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासने दिली गेली तर पुढील पाच वर्षांत त्याची पूर्तता होणे अपेक्षित आहे. आपण करीत असल्याचा कामाचा लेखाजोखाही त्यांनी मतदारांसमोर मांडणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.