पोलिस सुधारणांची अंमलबजावणी नाही - प्रकाश सिंग

पोलिस सुधारणांची अंमलबजावणी नाही - प्रकाश सिंग

पुणे - ""राष्ट्रीय पोलिस आयोग व सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार उपाय सुचविले. त्या दृष्टीने काही राज्यांनी कायद्यात बदल केले; परंतु या सुधारणांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास झपाट्याने झाला, पोलिस प्रशासनात कधीच बदल घडला नाही,'' अशी खंत उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक प्रकाश सिंग यांनी मंगळवारी केली. पोलिस दलानेही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा सामान्यांसाठी "पोलिसिंग' करावे, अशी टीकाही त्यांनी केली. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय व पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टच्या (पीसीजीटी) पुणे विभागातर्फे "बेटर पोलिसिंग' या विषयावर राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित केला होता. त्यामध्ये निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, "पीसीजीटी'चे अध्यक्ष एस. सी. नागपाल, सदस्य सत्यबीर दोड, ए. व्ही. कृष्णन, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप उपस्थित होत्या. 

पोलिसांमध्ये वसाहतवादी मानसिकता आजही कायम असल्याचे सांगत सिंग म्हणाले, ""सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही प्रमाणात सुधारणा झाल्या, 17 राज्यांनी "मॉडर्न पोलिस ऍक्‍ट' लागू केला; परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. पोलिसांचे प्रश्‍न गंभीर आहेत. पोलिस नागरिकांशी बांधील असून, त्यांनी समाजातील प्रश्‍न सोडविलेच पाहिजेत.'' 

सिंग म्हणाले, ""स्वातंत्र्योत्तर काळात गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखणे इथपर्यंत पोलिसांचे काम मर्यादित होते; परंतु आता दहशतवाद, नक्षलवाद, अमली पदार्थ व मानवी तस्करी, घुसखोरीसारखे अन्य प्रकार पुढे आले आहेत. देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली. माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, दूरसंचार व सामरिक शास्त्रामध्ये देश आघाडीवर आहे; परंतु पोलिस प्रशासनाच्या सुधारणांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. 

उमराणीकर म्हणाले, ""आपल्या देशात प्राचीन काळापासून पोलिस यंत्रणा आहे. पेशवाईमध्ये कोतवाल, सुभेदार अशी यंत्रणा निर्माण झाली. कोतवाल म्हणजे, पोलिस आयुक्त दर्जाचे पद होते. पोलिस कायम टीकेचा विषय ठरतो, मात्र पोलिसांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. पोलिस दलातील सुधारणांसाठी पोलिस आयोग झाला. त्यांनी सुधारणांबाबत सूचनाही केल्या. मात्र, त्या कागदावरच राहिल्या. पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील बदल किंवा सुधारणा करण्याकडे कधीच गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com