मराठी मुलाचा बळी जाता कामा नये -  राज ठाकरे 

मराठी मुलाचा बळी जाता कामा नये -  राज ठाकरे 

पुणे - सत्तेतील असो की विरोधातील दोघेही मतांच्या राजकारणासाठी तुमचा वापर करीत आहेत. वस्तुस्थिती काय आहे, हे कोणीही सांगण्यास तयार नाही. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, बेसावध राहू नका, हकनाक मरू नका, हे फक्त तुमच्या भावनांशी खेळून मतांसाठी वापर करीत आहेत, असे सांगून "माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही मराठी मुलाचा बळी जाता कामा नये', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सरकारला ठणकावून सांगितले. 

शिक्षण आणि नोकरी या विषयांवर मी काही काम करीत आहे. योग्य वेळ आली की मी हाक देईन, त्या वेळी तुम्ही या, असे आवाहन करीत ठाकरे म्हणाले, ""जातीपातीवर आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, ही भूमिका मी पहिली मांडली. आजही माझी हीच भूमिका आहे.'' 

पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. सभागृह तरुणांनी खचाखच भरले होते. या वेळी आमदार शरद सोनवणे, पक्षाचे नेते राजन शिरोडकर, अनिल शिदोरे, वसंत मोरे, अजय शिंदे, बाबू वागस्कर, बाळा शेडगे, किशोर शिंदे, बाबाराजे जाधवराव, रूपाली पाटील आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी पस्तीस मिनिटांच्या भाषणात केंद्र आणि राज्यातील भाजप- शिवसेना सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे महत्त्व या सरकारला कळलेच नाही. या राज्याचे बिहार-उत्तर प्रदेश करायचे यांनी ठरविले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, तेच मी बोलत राहणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

शिक्षण आणि नोकऱ्यांसाठीचे आरक्षण हवे आहे ना? परंतु खासगी उद्योगांना चालना देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. मग नोकऱ्यात आरक्षण कुठून मिळणार, असा प्रश्‍न करून ठाकरे म्हणाले, ""गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रात किती उद्योग आले, किती शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. तेथील नोकऱ्या कुठे गेल्या. परराज्यांतील मुलांना संधी दिली गेली. त्यांची आकडेवारी का जाहीर करीत नाहीत. येथून पुढे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगात अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के नोकऱ्या महाराष्ट्रातील मुलांसाठी ठेवल्या पाहिजेत. तसे झाले तर आरक्षणाची गरज कोणालाही भासणार नाही.'' 

गुरुमंत्र देणार नाही 
गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मेळावा होत असल्याने ठाकरे आपल्या मनसैनिकांना काय गुरुमंत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसे फलकही शहरभर लागले होते. परंतु भाषणाच्या सुरवातीलाच ठाकरे यांनी फ्लेक्‍सचा उल्लेख करून "मी कोणताही गुरुमंत्र वगैरे देणार नाही. गुरुपौर्णिमा आणि या मेळाव्याचा काही संबंध नाही. हा साधा मेळावा आहे. काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नव्याने करावयाच्या होत्या, तुम्हाला काही गोष्टी सांगावयाचा होत्या. त्यासाठी हा मेळावा होता.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com