गारठलेले विद्यार्थी परतले;रशियात शिकणाऱ्या भावी डॉक्‍टरांची अनेक अडथळ्यांवर मात 

sakal-exclusive
sakal-exclusive

पुणे - रशियात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना अडकून पडलेले विद्यार्थी अनेक अडथळ्यांवर मात करून, अखेर पुण्यात परतले. दिवाळीपूर्वी परतणे अपेक्षित असलेल्या या विद्यार्थ्यांचे आगमन लांबल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी मुले घरी आल्यावरच दिवाळीचा सण साजरा केला अन त्यांचाही जीव भांड्यात पडला. 

मॉस्कोजवळील कॉलीननग्रॉड येथील विद्यापीठात राज्यातील सुमारे 110 विद्यार्थी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असल्यामुळे विद्यापीठाने त्यांना भारतात परतण्याचा सल्ला दिला होता. परंतु, भारतीय दूतावासाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, त्यातच विमान कंपन्यांनी केलेली अडवणूक, मॉस्कोतील उणे तापमान यामुळे विद्यार्थी तेथे अडकले होते. लॉकडाउन सदृश परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे पुरेसे खाद्यपदार्थही नव्हते. अखेर पालकांनी पुन्हा पैसे पाठविल्यावर शनिवारी 40 विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर आणि रत्नागिरीत परतले. आणखी 40 विद्यार्थी मंगळवारी (ता. 25) परतणार आहेत. याबद्दल पालक सुनील आव्हाड म्हणाले, ""कॉलीननग्राड येथील परिस्थिती बिकट झाल्यामुळे मुले कशी परततील, याचे टेंशन होते. त्यातच तेथील भारतीय दुतावासाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ऐन दिवाळीत मुलांकडे लक्ष होते. ते आता घरी परतल्यामुळे त्यांचा आणि आमचाही जिवात जीव आला. आता आमची दिवाळी सुरू झाली.'' विमानतळावर आणखी दहा विद्यार्थी अडकले असून, त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

या विद्यार्थ्यांनी 11 नोव्हेंबरच्या मॉस्को- दिल्ली विमानाचे आरक्षण केले होते. परंतु, भारतीय दूतावासाने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे ऐनवेळी त्यांचा प्रवास रद्द झाला. अनेक विद्यार्थ्यांकडे मॉस्कोपासून विमानाने कॉलीननग्राड येथे जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना मॉस्को विमानतळावर कडाक्‍याच्या थंडीत अडकून पडावे लागले होते. त्यांच्या पालकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर थोडी फार हालचाल झाली अन विद्यार्थी पुण्यात परतण्यास सुरवात झाली. विमान सेवा उपलब्ध नसल्यामुळे उर्वरित 30 विद्यार्थी 2 डिसेंबर रोजी दिल्ली, मुंबईत परततील. "सकाळ'ने या बाबत पाठपुरावा केला होता. 

तेजस्विनी आव्हाड (विद्यार्थी) - विमान कंपन्या, भारतीय दूतावास यांच्या टोलवाटोलवीमुळे घरी जाता येईल का, या बद्दल प्रचंड अनिश्‍चितता निर्माण झाली होती. घरचे लोक धीर देत होते. पण, कॉलीननग्रॉडमधील परिस्थिती वेगळी होती. काढलेल्या तिकिटाचे पैसेही परत मिळाले नाही. त्यामुळे खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर एकदाची घरी पोचले, त्यामुळे आता जरा बरं वाटत आहे. 

खुशी खांबरे (विद्यार्थी) - घरापासून एवढ्या दूरवर शिक्षण घेताना भारतीय दूतावास मदत करेल, असे वाटत होते. परंतु, त्यांचे भलतेच सुरू होते. तिकीट काढायची अगोदर त्यांना विचारले होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड पडला. वाढती थंडी, लॉकडाउनसारखी परिस्थिती त्यामुळे तेथील खाद्यपदार्थांचे दरही वाढले. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांची मुले अजूनही तेथे अडकली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com